मुंबई – देशात कोविडशी लढण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. कुठलेही नियोजन न करता घोषणा केल्या जातात. राज्यांना लस पोहोचवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. उद्यापासून लसीकरणाची घोषणा केली आहे. मात्र, लसच नाही, तर लसीकरण होणार कसे? याचे सरकारला उत्तर द्यावे लागेल, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्तेव राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
1 मेपासून राज्य सरकार आपल्या पैशांद्वारे लोकांचे मोफत लसीकरण करू शकते. मात्र, देशात लसच उपलब्ध नाही. एक कंपनी आहे सीरम ज्यांची उत्पादन क्षमता आहे, परंतु देशातील सर्व ऑर्डरच ती पूर्ण करू शकत नसल्याचे दिसत आहे. भारत बायोटेकची उत्पादन क्षमता अतिशय कमी आहे. अन्य कंपन्यांना परवानगी देण्याचे काम होत नाही. अशी सगळी परिस्थिती असतानाही जगभरातील देशांना लस वाटण्याचे काम मोदींनी केले. आम्हाला वाटते कोविडबाबत नियोजनाचा अभाव आहे. घोषणा करण्याअगोदर त्यावर चर्चा केली जात नाही, तयारी केली जात नाही. उद्यापासून लसीकरणाची घोषणा केली आहे, लस उपलब्धच नाही तर लसीकरण होणार कसे, असा सवाल त्यांनी केला.