प्रा. विजया पंडित
विषाणूग्रस्त पेशींवर औषधाने थेट हल्ला केल्यास विषाणूला मारून पेशींना वाचविणे शक्य होत नाही. त्यामुळेच विषाणुरोधी औषधे तयार करणे हे सोपे काम बिलकूल नाही.
2020 या एकाच वर्षात अँटी व्हायरल औषधांचे तब्बल 44 नवे ब्रॅंड लॉंच झाले. या सर्व ब्रॅंड्सची सरासरी विक्री प्रत्येकी 23.38 कोटी रुपये झाली. रेमडेसिविर आणि फेविपिरावीर या दोन औषधांनी किमान 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई या काळात केली आहे. जुलै ते डिसेंबर 2020 या काळात रेमडेसिविरची विक्री 593 कोटी रुपयांची झाली. जून ते डिसेंबर 2020 या काळात फेविपिरावीर या औषधाची 424 कोटी रुपयांची विक्री झाली. या आकडेवारीवरून विषाणुरोधी औषधांची सध्याची मागणी आणि त्यावर आधारित अर्थकारण लक्षात येईल. अँटी व्हायरल औषधे तयार करणे सोपे नसते आणि म्हणूनच त्यांची बाजारपेठ सध्या एवढी फुगलेली दिसते आहे.
ही औषधे बनविणे अवघड का असते? हे समजून घेणे गरजेचे आहे. करोनाच्या जागतिक संसर्गाने सध्या पुन्हा एकदा कळस गाठला आहे. एकेका दिवसात अडीच लाख नवीन रुग्ण आढळण्याचा काळ भारत अनुभवतो आहे. महाराष्ट्रात या साथीला “म्यूटेन्ट व्हेरिएन्ट’ म्हणजे विषाणूमध्ये झालेले उत्परिवर्तन कारणीभूत असल्याचे तज्ञांचे मत आहे. रुग्णसंख्येचा आलेख असाच चढा राहू शकतो, अशी भीती त्यांना वाटते. वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती झालेली असताना आणि प्रत्येक देशात तज्ज्ञ डॉक्टरांची एवढी मोठी संख्या असताना अजूनही या आजारावर प्रभावी औषध का शोधून काढता आले नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. विषाणुरोधी औषध तयार करायला मोठा कालावधी लागतो की तसे औषध बनविणे शक्यच नसते? असाही प्रश्न पडू शकतो.
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी आपल्याला विषाणुरोधी औषधांचे स्वरूप समजून घ्यावे लागेल. अँटीव्हायरल ड्रग्ज म्हणजे अशी औषधे, जी फ्लूसारख्या आजाराशी लढण्यासाठी डॉक्टरांकडून लिहून दिली जातात. टॅबलेट, कॅप्सूल, सिरप, पावडर या स्वरूपात ही औषधे उपलब्ध असतातच; शिवाय ती “इंट्राविनस’ म्हणजे नसांमधून देण्याजोगीही असतात. अर्थात ही औषधे काउंटरवर केवळ नाव सांगून मिळत नाहीत. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ती मिळत नाहीत. अँटी व्हायरल औषधे आजार सुरू झाल्यानंतर 48 तासांत सुरू केली तर रुग्ण ठीक होण्याची सर्वाधिक शक्यता असते. ही औषधे दोन प्रकारे काम करतात. पहिले काम म्हणजे, ही औषधे जीवाणूंवर (बॅक्टेरिया) थेट हल्ला चढवितात आणि त्यांची वाढ रोखतात. दुसरे म्हणजे, बॅक्टेरियांची वाढ ही औषधे रोखतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, अँटीव्हायरल औषधांमुळे दरवर्षी कोट्यवधी लोकांचा जीव वाचतो. अर्थात, अँटीव्हायरल औषधे तयार करणे थोडे अवघड असते.
वस्तुतः विषाणू कोणताही असला तरी तो शरीरातील पेशी हेच आपले घर बनवितो आणि पेशीच्याच आधारे स्वतःची प्रतिरूपे तयार करून गुणन प्रक्रियेद्वारे वाढू लागतो. विषाणूतील प्रथिन शरीरातील कोणत्याही पेशीला जखडून ठेवते आणि विषाणू त्या पेशीत प्रवेश करतो. या पेशीला “होस्ट सेल’ म्हणतात. त्यानंतर “होस्ट सेल’च्या सर्व प्रक्रियांवर विषाणू नियंत्रण मिळवितो आणि सातत्याने वाढत राहतो. या प्रक्रियेत तो शरीरातील अनेक निरोगी पेशींना आजारी करून टाकतो. अँटी व्हायरल औषध जर विषाणूची जीवनसाखळी तोडू शकले, तरच ते यशस्वी ठरते. परंतु अडचण अशी की, विषाणू नेहमी शरीरातील निरोगी पेशींना आपले घर बनवितो आणि जर विषाणूला मारायचे असेल तर नाईलाजाने या प्रक्रियेत शरीरातील निरोगी पेशीही मरू शकतात. विषाणूंना मारणे जेवढे अवघड असते त्याहून कितीतरी अवघड असते शरीरातील निरोगी पेशींचा बचाव करणे.
जे औषध शरीरातील विषाणूंवर थेट हल्ला चढवेल आणि “होस्ट सेल’च्या संरचनेचे कमीत कमी नुकसान करेल तेच खरे चांगले विषाणुरोधी औषध होय. इन्फ्लूएन्जा आजारावरील औषध हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हे औषध थेट विषाणूच्या एन्जाइमवरच हल्ला करते आणि त्यामुळे संसर्गाची गतीच थांबते.
बॉन विद्यापीठातील विषाणुतज्ज्ञ (व्हायरोलॉजिस्ट) डॉ. मार्सेल ए. मुलर यांच्या म्हणण्यानुसार, करोना विषाणूच्या वेगवेगळ्या स्पेक्ट्रमना म्हणजे प्रकारांना सायक्लोस्पोरिन या औषधाने रोखता येते. माणसांसाठी जे करोना विषाणू घातक आहेत, त्यात “सार्स’ आणि “मर्स’ म्हणजे मिडल ईस्टर्न रेस्परेटरी सिन्ड्रोम यांचा समावेश आहे. हिवाळ्याच्या दिवसांत आपल्याला सर्दी होते, त्यामागेही विषाणूच असतो. याखेरीज मांजरांना होणारा फ्लू किंवा डुकरांना होणारा घातक करोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठीही सायक्लोस्पोरिन उपयोगाला येते. विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशी नष्ट होण्याचे कारण म्हणजे प्रथिनांच्या सहाय्याने विषाणू पेशीमध्ये शिरतो. यातील एका प्रथिनाचे नाव सायक्लोफिलिन असे आहे. विषाणूंची संख्या वाढविण्यात हे प्रथिन महत्त्वाची भूमिका बजावते. सायक्लोफिलिन इतर प्रथिनांना योग्य बाजूला वाकवते. विषाणूवाहू प्रथिने योग्य प्रकारे वाकवली गेली, तर ती विषाणूंचा प्रसार करू शकत नाहीत. या प्रक्रियेला “प्रोटीन फोल्डिंग’ असे म्हटले जाते. सायक्लोफिलिन प्रथिनांना रोखण्याचे काम सायक्लोस्पोरिन करते आणि मग विषाणू आपोआपच कमी होतात.
अर्थात, सायक्लोस्पोरिन औषधांचे काही दुष्परिणामही आहेत. सर्वांत मोठा परिणाम म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती त्यामुळे दबली जाते. अशा वेळी जर दुसऱ्या एखाद्या विषाणूचा हल्ला शरीरावर झाला तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. सायक्लोस्पोरिनच्या अणूंची रचना अशा प्रकारे तयार करण्याचे शास्त्रज्ञांचे ध्येय आहे, ज्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकार क्षमतेवर परिणाम होणार नाही आणि विषाणू मात्र नष्ट होईल. आतापर्यंत या बाबतीत काही प्रयोग यशस्वीही झाले आहेत. म्युनिख विद्यापीठातील विषाणुतज्ज्ञ फॉन ब्रुन म्हणतात की, सायक्लोस्पोरिन वापरून तयार केलेल्या औषधाचा वापर आम्ही माणसावर चाचणी स्वरूपात करीत आहोत. या औषधामुळे हिपेटायटिस सी विषाणूंची संख्या मर्यादित ठेवण्यातही मदत मिळाल्याचे सांगण्यात येते.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जखमी सैनिकांचा बचाव करण्यासाठी अनेक अँटी बॅक्टेरियल म्हणजे जीवाणुरोधी औषधे तयार करण्यात आली होती. पेनिसिलिन हे त्यातील प्रमुख औषध होते. मात्र विषाणूमुळे निर्माण होणाऱ्या आजारांचा खातमा करण्याच्या दृष्टीने फारसे संशोधन झाले नाही. करोना विषाणूने संपूर्ण जगावर हल्ला केल्यानंतर ही पोकळी ठसठशीतपणे समोर आली आहे. नवनवीन तंत्रज्ञान आणि डॉक्टरांची उत्तम टीम आपल्याकडे असूनसुद्धा करोना विषाणूने ग्रस्त असलेल्यांचा जीव वाचविण्यासाठी फारसे काही करता येत नाही, अशी अवस्था आहे. त्याचे प्रमुख कारण अर्थातच, विषाणूने हल्ला केलेल्या पेशींना वाचवून विषाणूंना मारणे हे अवघड काम असते हेच आहे.