मुंबई – राज्याच्या मंत्रीमंडळात मोठे बदल होणार, या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीने मंत्रीमंडळात खांदेपालट होणार असं चित्र आहे. यात गृहमंत्री बदलाची शक्यता निर्माण झाली आहे. पूजा चव्हाण आणि सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात अपयश आल्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे असलेलं गृहखातं काढून घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या पदासाठी राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची नावं आघाडीवर आहेत.
अजित पवार तात्काळ निर्णय घेण्यासाठी परिचित आहेत. विरोधकांशी संबंध चांगले असल्याने अजित पवारांकडे हे खातं गेल्यास विरोधक या खात्याला टार्गेट करणं थांबवतील. त्यामुळे अजितदादांकडे हे पद देण्याचं राष्ट्रवादीत मंथन सुरू असल्याचं समजतं. मात्र अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद असल्याने जयंत पाटील यांचं नावही समोर येत आहे.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यापूर्वी गृहमंत्रीपद सांभाळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हे पद द्यावं, अशी मागणी होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्याचवेळी अनिल देशमुख यांना इतक्यात हटविण्यात येणार नाही, असंही जाणकारांचं म्हणणं आहे. अनिल देशमुख हे राज्यातील अनुभवी नेते आहेत. त्यांना मंत्रिपदाचा दीर्घकाळ अनुभव आहे. आघाडी सरकार चालवत असताना निर्णय घेताना दिरंगाई होतेच. मात्र त्यामुळे देशमुख यांना बदललं जाईल अशी शक्यता कमी असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.