लोणावळा – जंगल ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या उदयसागर या तलावात बुडून एका 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. “व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येला ही दुर्दैवी घटना घडली.
कौशिक अय्यर (वय 21, रा. ठाकुर्ली, ठाणे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशिक अय्यर हा ठाकुर्ली, ठाणे येथील रहिवासी होता. शनिवारी (दि. 13) राजमाची येथे “कॅम्पिंग’ करण्यासाठी अन्य 70 युवकांच्या गटासोबत तो रायगड जिल्ह्यातील राजमाची डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कोंडीवडे या गावातून ट्रेकिंग करीत राजमाची गावात आला होता. त्याठिकाणी गावापासून काही अंतरावर असलेल्या उदयसागर या छोट्या तलावावर सर्वजण फिरण्यासाठी गेले असता सायंकाळी 6 वाजता अन्य काही मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी कौशिक याने तलावाच्या काठावर असलेल्या भिंतीवरून तलावात सूर मारला.
मात्र त्याठिकाणी तलाव उथळ असल्याने त्याच्या डोक्याला मार लागला आणि तो पाण्यात बुडाना. अन्य युवकांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो मिळून आला नाही.
या घटना कामशेत पोलीस ठाण्यात समजताच सहायक पोलीस निरीक्षक कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक महेश दौंडकर, धेंडे व वाळुंजकर यांनी राजमाची गाठली. मात्र खूप रात्र झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. रविवारी सकाळी लवकरच पोलिसांनी स्थानिक राजमाची ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा शोधकार्य सुरू केले असता सकाळी साडेनऊ वाजता कौशिक याचा मृतदेह पाण्यात मिळून आला.