- मावळातील पाच हजार 995 कृषी ग्राहकांना लाभ मिळणार
- कृषी ग्राहकांना वीजबिल थकबाकीमध्ये 11 कोटींची माफी मिळू शकते
- पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज, विलंब आकार 100 टक्के माफ
मावळ – राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत पुणे परिमंडलमधील मावळ तालुक्यातील प्रामुख्याने कृषिपंपधारकांसह 5 हजार 995 कृषी वीजग्राहकांना थेट लाभ मिळणार आहे. या कृषी ग्राहकांकडे सद्यस्थितीत 62 कोटी 13 लाख रुपयांची एकूण थकबाकी असून, त्यामध्ये निर्लेखन, व्याज व दंड माफीचे एकूण 11 कोटी 12 लाख रुपये माफ करण्यात आले आहे. उर्वरित मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीचे तब्बल 25 कोटी 50 हजार रुपये माफ करण्यात येणार आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ, व खेड तालुक्यांमध्ये 1 लाख 25 हजार 192 कृषी ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांकडे व्याज व विलंब आकारासह एकूण 921 कोटी 89 लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणकडून निर्लेखनाद्वारे या कृषिग्राहकांना 41 कोटी 92 लाख रुपयांची सूट मिळाली आहे. तर व्याज व विलंब आकारातील एकूण 102 कोटी 17 लाखांची सूट अशी एकूण 144 कोटी 9 लाखांची सूट देण्यात आली आहे.
कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 मध्ये प्रामुख्याने कृषिपंपासह सर्व उच्च व लघुदाब तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या 5 वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर 2015 पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार 100 टक्के माफ करून व्याज 18 टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे.
…असे असेल कृषी ग्राहकांसाठी नवे धोरण
नव्या धोरणाप्रमाणे मावळ तालुक्यातील कृषी ग्राहकांकडे आता 51 कोटी एक लाख रुपयांची मूळ थकबाकी शिल्लक आहे. योजनेनुसार या सर्व कृषी ग्राहकांनी त्यांच्या मूळ थकबाकीच्या 50 टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येणार आहे. म्हणजेच येत्या वर्षभरात 5 हजार 995 कृषीग्राहकांनी मूळ थकबाकीच्या 25 कोटी 50 हजार रुपयांचा भरणा केल्यास उर्वरित थकबाकीचे 25 कोटी 50 हजार रुपये माफ करण्यात येणार आहे. मात्र, ज्या ग्राहकांनी या योजनेत दोन किंवा तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम नियमित भरणे आवश्यक आहे.
महावितरणकडून आवाहन
विशेष म्हणजे कृषी ग्राहकांना संबंधित वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम आदींचा तपशील महावितरणने https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ या वेबपोर्टलवर मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिला आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट केल्यानंतर योजनेतीललसंबंधित बिलाचा संपूर्ण तपशील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या कार्यालयात संपर्क साधावा.
कृषी ग्राहकांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याने पुणे परिमंडलामध्ये कृषी ग्राहकांशी थेट संवाद साधून या योजनेची माहिती देण्यात येत आहे. तसेच वीजबिलांबाबत शंका किंवा तक्रारी असल्यास त्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना संबंधित कार्यालयांना दिल्या आहेत. त्यांच्यासह ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार तसेच सर्व अभियंता व कर्मचारी कृषी ग्राहकांशी थकबाकीमुक्ती योजनेबाबत थेट संवाद साधत आहेत. या योजनेतून तसेच चालू वीजबिलांतून वसूल झालेल्या एकूण रकमेपैकी 33 टक्के रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात, तर 33 टक्के रक्कम जिल्हास्तरीय क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण तसेच विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.
– सचिन तालेवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल.