पुणे -संशोधनात रमणारा आणि साहित्यक्षेत्राच्या बाहेरचा असूनही माझी संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड हाच माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. युवकांच्या मनात विज्ञानाविषयीची ओढ निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे मत नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयुका येथे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर यांचा प्रथेप्रमाणे पहिला सत्कार करण्यात आला. यावेळी मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, मंगला नारळीकर, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार आदी उपस्थित होते.
संमेलनाध्यक्षपदी डॉ. नारळीकर यांची झालेली निवड ही मराठी साहित्य विश्वासाठी आनंददायी घटना आहे. त्यांच्या निवडीमुळे समाजाच्या वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ होतील. विज्ञानाच्या अधिष्ठानावर उभी राहिलेली लोकशाही अधिक समृद्ध होईल. मसापने डॉ. नारळीकरांचे नाव अग्रक्रमाने सुचविले आणि महामंडळाने त्यास मान्यता दिली. याचा मला मसापचा अध्यक्ष या नात्याने विशेष आनंद असल्याचे डॉ. कसबे म्हणाले.
डॉ. नारळीकरांनी त्यांच्या लेखनातून जिज्ञासूवृत्ती आणि विज्ञाननिष्ठा मराठी समाजमनात रुजविली. साहित्य संमेलनांनी विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या लेखकांकडे दुर्लक्ष केले अशी खंत मराठी वाचकांमध्ये होती. डॉ. नारळीकरांच्या निवडीने ती दूर झाली आहे. आकाशातील एका ताऱ्याला कुसुमाग्रजांचे नाव दिले आहे. अशा कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत होत असलेल्या संमेलनाचे अध्यक्षपद आकाशाशी नाते जडलेले डॉ. नारळीकर भूषवित आहेत, याचा आनंद गगनात न मावणारा असल्याचे प्रा. जोशी म्हणाले.प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.