मुंबई – “रावळगाव’ हे नाव उच्चारताच आपल्याला आठवतात त्या विविध प्रकारच्या गोळ्या. “गोळ्या खाऊ नकोस… दात किडतील…’ असे आपल्याला आपल्या आई-वडीलांनी सांगितले असेलच; पण त्यांच्याही आई-वडीलांनी त्यांनाही हेच वाक्य ऐकवले असेल. चॉकलेटी रंगाच्या आणि पारदर्शक कागदात लपेटलेल्या गोळ्या असोत किंवा “पान पसंद’सारख्या सदाबहार टेस्टी गोळ्या असोत, रावळगाव हे नाव प्रत्येकाला माहिती असलेलं असतंच. तर आजवर आपण नकाशामध्ये शोधलंही नसेल, की हे रावळगाव नक्की आहे कुठं? आणि या रावळगावच्या साखरी गोळ्यांचे म्हणजेच शुगर बॉईल्ड टॉफीजचे जनक आहेत तरी कोण? चला तर माहिती करुन घेऊया रावळगावबद्दल…
वालचंदनगर इंडस्ट्रीजचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद दोशी यांनी ब्रिटीश-शासित भारतात आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. सोलापूरहून एकदा नाशिकला रेल्वेने जात असताना, त्यांच्या मित्राने रावळगाव येथील साधारण 1500 एकर नापिक जमीन दाखवली. या जमिनीवर शेठ वालचंद हिराचंद यांनी देशातला पहिला साखर कारखाना उभारला आणि उस लागवड करत असलेल्या शेतकऱ्यांना एक नवा मार्ग सापडला. येथे उसाचा रस काढून, त्याचे बॉयलरद्वारे गाळप करुन शेट वालचंद हिराचंद यांनी साखर तयार केली आणि याच साखरेपासून त्यांनी विविध गोळ्यांची निर्मिती सुरु केली. यामुळे गावासह पंचक्रोशीतील लोकांना मोठी रोजगाराची संधीही मिळाली.
काही वर्षांनंतर शेठ वालचंद हिराचंद यांनी सोलापूर जिल्ह्यातील कळंब येथे साखर कारखान्यांना लागणाऱ्या मशिनरीचे उत्पादन सुरु केले. आज त्याच औद्योगिक साम्राज्याला आपण “वालचंदनगर’ या नावाने ओळखतो.
साधारणपणे वर्ष 1933 मध्ये रावळगाव साखर कारख्यानाची स्थापना करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात गोळ्यांचे उत्पादन वर्ष 1940 च्या सुमारास सुरु झाले. विविध प्रकारच्या गोड गोळ्या, कॅंडीज आणि चॉकलेट्स हीच आपल्या लहानपणची चैन होती आणि एक पैशापासून पाच पैशांपर्यंत मिळणाऱ्या या गोळ्या खाण्यासाठी बालचमू अनेकदा हटून बसायचा. रावळगावची गोळी किंवा चॉकलेट खाल्लंच नाही किंवा हे नक्की काय असतं, हेच माहिती नाही, असाही एकही व्यक्ती सापडणे आजही मुश्कीलच आहे.
“पान पसंद,’ “मॅंगो मुड’ “ऑरेंज-लेमन-स्ट्रॉबेरी’ टॉफीज अशा असंख्य उत्पादनांमधून आजही रावळगावचा ब्रॅंड मार्केटवर राज्य करतो आहे. “बालपणीचा काळ सुखाचा…’ असे नेहमी म्हटले जाते; मात्र हा काळ सुखाचा करण्यात रावळगावचा मोठा वाटा होता; आहे, हे विसरुन कसे चालेल?