रस्ते, ड्रेनेज, पथदिवे, पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा
स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष : जाधववाडी, चिखलीकर त्रस्त
पिंपरी – चिखली, जाधववाडी, कुदळवाडीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये नागरिकांसाठी असलेल्या पायाभूत सोयीसुविधांचा अभाव दिसून येत आहे. या प्रभागातील अनेक भागात रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे. बाह्य व अंतर्गत रस्ते, पथदिवे, ड्रेनेज लाईनसह स्वच्छतागृहांच्या समस्यांनी रहिवासी त्रस्त आहेत. विशेष म्हणजे या प्रभागात महापौरपदाची संधी मिळून देखील समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चिखली, जाधववाडी, चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडेन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, वुड्स व्हिला, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी या परिसरातील विकासकामांच्या गेल्या अनेक दिवसांपासून बोजवारा उडाला आहे.
बाह्य व अंतर्गत रस्ते, पथदिवे, ड्रेनेज लाईन, उद्याने, क्रीडांगणे यासह सार्वजनिक स्वच्छतागृहाचा देखील अभाव आहे. येथील नागरिकांना पिण्याचे पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ड्रेनेज व्यवस्था नसल्याने अनेक भागात रस्त्यावरच सांडपाणी वाहत आहे. तसेच कित्येक ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे. असे असताना आरोग्य विभागाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याठिकाणी धूर फवारणी न केल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत.
प्रभाग क्रमांक दोन परिसरातील बाह्य आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. येथील रस्ता ठिकठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहे. माजी महापौरांनी नियोजित रस्त्याच्या हद्दीत कार्यालय थाटल्याने रस्ता अडला आहे. यामुळे अनेकवेळा नागरिकांना जीवघेण्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार वर्षंत स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याने रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत आहे. काही रस्त्यांचे डांबरीकरण केलेले नाही. अनेक गल्लोगल्ली पेव्हींग ब्लॉक बसविलेले नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिक नगरसेवकांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत आहेत.
अनधिकृत बांधकामे जोरात
चिखली, जाधववाडी, कुदळवाडी परिसरात स्थानिक नगरसेवकांच्या वरदहस्ताने अनधिकृत बांधकामासह पत्राशेड मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहे.
याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणिवपुर्वक कानाडोळा केल्याने प्रभागाचे विद्रुपीकरण वाढले आहे. नाले साफसफाई व्यवस्थित होत नाही. जाधववाडीच्या नाल्यांचे पाणी वर्षांनुवर्षे तुंबून ठेवले आहे. नाल्यांचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याने पाणी जागोजागी साचून राहत आहे. काही ठिकाणी चेंबर तुटल्याने सर्व मैला नाल्यांमध्ये मिश्रण होऊन परिसरात दुर्गंधी सुटली आहे. तसेच नऊ कोटी खर्च करुनही नाल्याचे काम अर्धवट राहिले आहे. अनेक भागात पथदिव्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे गेल्या चार वर्षांत नगरसेवकांना योग्य पायाभूत सोयी-सुविधा देता न आल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.