नवी दिल्ली – देशात इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि नवनिर्मितीमध्ये सुधारणा झाली आहे, उत्पन्नात वाढ झाली आहे आणि त्या क्षेत्रात भारताचा ब्रॅंड तयार झाला आहे. आता जागतिक कृषी बाजारपेठांमध्ये तितक्याच प्रतिष्ठेचा भारताचा ब्रॅंड प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देशभरातील शेतक-यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. यावेळी देशभरातील शेतक-यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.
नरेंद्र मोदी म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची विक्री करण्यासाठी नव्या बाजारपेठा खुल्या करण्याचे सरकारचे लक्ष्य होते. सरकारने देशभरात एकहजारपेक्षा जास्त ऑनलाईन कृषी बाजारांची भर घातली. या बाजारांमध्ये एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे, असे ते म्हणाले.
लहान शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्याचे सरकारने प्रयत्न केले जेणेकरून ते त्यांच्या भागात एक संघटित बळ म्हणून काम करू शकतील. सध्या 10,000 पेक्षा जास्त कृषी उत्पादक संघटना- एफपीओ तयार करण्याची मोहीम सुरू असून त्यांना अर्थसाहाय्य देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मोदी म्हणाले, जेव्हापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू झाली आहे, तेव्हापासून 1 लाख 10 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र एकमेव पश्चिम बंगालमधील 70 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव, या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, ते हे पैसे घेऊ शकत नाहीत. कारण, बंगाल सरकारच्या राजकीय कारणांमुळे त्यांच्या राज्यांमधील शेतकऱ्यांना ते पैसे मिळत नाही, असे म्हणत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.
शेतकरी गणेश भोसले यांच्याशी संवाद –
देशातल्या वेगवेगळया भागातील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेताना, मोदींनी महाराष्ट्रातील लातूरमधील शेतकऱ्याशी संवाद साधला. गणेश भोसले असे या शेतकऱ्याचे नाव आहे. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अवसा तालुक्यातील मातुला गावात हा शेतकरी राहतो.
त्याची तीन हेक्टरची शेती असून, यात तो सोयाबीन, तूर ही पीके घेतो. शेतीशिवाय आपल्याकडे नऊ गायी आणि तेरा म्हशी असल्याचे त्याने सांगितले. दूध विक्रीचा सुद्धा व्यवसाय असल्याचे गणेश भोसलेंनी मोदींना सांगितले.