कोलकता – किसान सन्मान निधीबाबत अर्धसत्य मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेची दिशाभूल करत आहेत, असा पलटवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला. त्या निधीबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांशी संपर्क साधल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोदी यांनी ममता यांच्या सरकारवर निशाणा साधला. बंगालमधील 70 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ममता सरकारने किसान सन्मान निधीपासून वंचित ठेवल्याचे त्यांनी म्हटले. त्यावर ममतांनी प्रतिक्रिया दिली.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी मोदी यांनी त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. मोदी सरकारसमवेत बंगालमध्ये विविध योजना राज्य सरकार राबवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताची योजना न राबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना दोन पत्रं पाठवली.
दोन दिवसांपूर्वी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्कही साधला. खरेतर, मोदी सरकारच सहकार्य करण्यास नकार दर्शवत आहे. त्याऐवजी, राजकीय लाभासाठी आमच्या बदनामीची मोहीम राबवत आहे, असा प्रत्यारोप ममतांनी केला. किसान सन्मान निधीची रक्कम राज्य सरकारमार्फत वितरीत व्हावी, अशी ममतांची भूमिका आहे.