नवी दिल्ली – विश्व भारतीचा शंभर वर्षांचा प्रवास प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे. हे विद्यापीठ म्हणजे भारतमातेप्रती गुरुदेवांचे असलेले चिंतन, दृष्टीकोन आणि कठोर परिश्रमाचे प्रतिक आहे. गुरुदेवांनी ठेवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विश्व भारती, श्रीनिकेतन आणि शांतीनिकेतन सातत्याने कार्यरत असल्याबद्दल पंतप्रधानांनी संतोष व्यक्त केला.
शांतीनिकेतन मधल्या विश्व भारती विद्यापीठाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे ते संबोधित करत होते. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारतीच्या दृष्टीची बीजे आत्मनिर्भर भारत संकल्पनेत आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान या विद्यापीठाचे कुलपती आहेत.
विश्वभारती देत असलेल्या संदेशाचा, आपला देश, संपूर्ण जगभरात प्रसार करत आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीद्वारे पर्यावरण रक्षणात भारत आज जगात अग्रेसर आहे. पॅरीस कराराची पर्यावरण विषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य मार्गावर असलेला भारत हा एकमेव प्रमुख देश आहे असे ते म्हणाले.
श्री रामकृष्ण परमहंस यांच्यामुळे भारताला स्वामी विवेकानंद प्राप्त झाले.
विवेकानंदानी भक्तीची व्याप्ती वाढवत प्रत्येक व्यक्तीमध्ये दिव्यत्व पाहिले. भक्ती चळवळीचा देशाच्या सर्व भागातल्या महान संतानी भक्कम पाया घातला. भक्ती चळवळीच्या शेकडो वर्षांच्या कालखंडाबरोबरच देशात कर्म चळवळही झाली. गुलामगिरी, साम्राज्यवाद आणि शोषणाविरोधातला सामान्य नागरिकांचा संघर्ष टिपेला पोहोचला होता आणि भविष्यात आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे ते महत्वाचे प्रेरणा स्थान ठरल्याचे पंतप्रधान म्हणाले.
वेदापासून ते विवेकानंदापर्यंत भारताची चिंतन धारा गुरुदेवांच्या राष्ट्रवादाच्या चिंतनात दिसत होती. ही धारा अंतर्मुख नव्हती, भारताला इतर देशांपासून वेगळी राखणारी नव्हती. भारतात जे सर्वोत्तम आहे त्याचा लाभ जगाला व्हावा आणि त्याच वेळी जे जगात सर्वोत्तम आहे ते भारताने आत्मसात करावे असा हा दृष्टीकोन होता.
ज्ञानाच्या अधिष्ठानावर, स्वातंत्र्य लढा जिंकण्यासाठी वैचारिक आंदोलन उभे करण्याबरोबरच उज्वल भारत निर्माण करण्यासाठी भावी पिढी तयार करण्याची काळाची गरज होती. भक्ती चळवळीने आपल्याला एकजूट केले, ज्ञान चळवळीने आपल्याला बौद्धिक बळकटी दिली आणि कर्म चळवळीने आपल्या हक्कांसाठी लढण्याचे धैर्य दिले. असेही पंतप्रधान म्हणाले.
आत्मनिर्भर भारताचा गाभा…!
विश्व -भारती हे नावच भारत आणि जग यांचा समन्वय दर्शवते.विश्व भारतीसाठी गुरुदेवांचा दृष्टीकोन हा आत्मनिर्भर भारताचा गाभा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आत्मनिर्भर भारत अभियान म्हणजे जगाच्या कल्याणासाठी भारताच्या कल्याणाचा मार्ग आहे. हे अभियान भारताला आधी सबल करण्याचे अभियान आहे, हे अभियान भारताच्या भरभराटीतून जगात समृद्धी आणण्यासाठीचे अभियान आहे असे पंतप्रधान म्हणाले.