श्रीनगर – उत्तर काश्मीरमध्ये गुरूवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांची ओळख तातडीने पटू शकली नाही. बारामुल्ला जिल्ह्यात एका ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी शोधमोहीम हाती घेतली.
त्या मोहिमेवेळी जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. संबंधित परिसरात आणखी दहशतवादी दडले असल्याच्या शक्यतेने सुरक्षा दलांनी हाती घेतलेली शोधमोहीम बराच काळ सुरू होती.
चालू वर्षात सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात धडक मोहिमा राबवल्या. त्यामध्ये आतापर्यंत मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत. त्याशिवाय, अनेक दहशतवाद्यांना अटक करण्यातही यश आले.