नवी दिल्ली – शेतकरी संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाला कॉंग्रेसने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. संपूर्ण देशभरातील सर्व राज्यात आणि जिल्ह्यात त्या दिवशी आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनांनी हा भारत बंद ताकदीने यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
कमल हसन यांच्या मक्कल निधी मैय्यम या पक्षानेही भारत बंदला पाठींबा दिला आहे. दरम्यान दिल्लीच्या प्रवेद्वारावर सुरू असणाऱ्या आंदोलनाचा आज अकरावा दिवस होता.
कृषी कायद्याला असणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कायद्यात काही प्रमाणात दुरूस्ती करण्याची तयारी दाखवली. मात्र, हे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम राहिले. भारतीय जनता पक्षाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे अधिवेशन बोलावण्याची शक्यता फेटाळता येत नाही. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
हे कृषी कायदे संपूर्णत: मागे घेण्यापेक्षा अन्य कोणत्याही बाबींवर तडजोड केली जाणार नाही, यावर शेतकरी संघटनांचे नेते ठाम आहेत. किमान आधारभूत किंमत हटवण्याचा निर्णय आणि बाजार समिती नाहीशा करण्याचा निर्णय हा कॉर्पोरेट क्षेत्राला लाभ होण्यसाठी घेतल्याचा आरोप शेतकरी नेते करत आहेत.
शनिवारी झालेल्या चर्चेत किमान आधारभूत किंमत रद्द केली जाणार नाही, असे आश्वासन नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांना परत पाठवण्याची विनंती केली. मात्र तीही शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावली.
शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या हाकेला समर्थन देण्यासाठी तमिळनाडू द्रमुकने राज्यव्यापी आंदोलन केले. द्रमुकने भारत बंदला पाठींबा दर्शवला आहे. कर्नाटकातील कन्नड रयत संघटनेने मंगळवाऱ्या बंदमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही बंदला पाठींबा देत शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगितले. भारतीय किसान संघाने या कायद्याला विरोध आणि आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी नोएडामध्ये अर्धनग्न मोर्चा काढला.
पुरस्कार वापसी सुरूच
ऑलिम्पिक पदक विजेता मुष्टीयोध्दा विजेंदरसिंग यांने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. त्याने हे काळे कायदे सरकारने मागे घेतले नाहीत तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे.
मानसा येथून दुकानदार, उद्योजक आणि अरिहंत यांची 100 वाहने आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहेत. शहरी भागातील अनेक दुकांनावर आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, असे फलक लागले आहेत.