नवी दिल्ली – अरणाचल प्रदेशच्या सीमेपासून अंदाजे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्न ला पास जवळ चीनने तीन गावे वसवली असल्याचे उघड झाले आहे. भारत-चीन आणि भुतानच्या दरम्यानच्या त्रिकोणी प्रदेशापासून हा भाग अगदी जवळ आहे.
या भागातील सीमेवरून भारत आणि चीन दरम्यान मतभेद आहेत. अरुणाचल प्रदेशवर चीनकडून फार पूर्वीपासून दावा सांगितला जातो आहे. नवीन गावे वसवून चीनने या दाव्याचे समर्थनच केले आहे.
आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी आणि सीमेवरील घुसखोरी वाढवण्यासाठी चीनकडून भारताच्या सीमेजवळ चायनीज कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य असलेल्या हान चायना आणि तिबेटीयन सदस्यांचा उपयोग करून घेत आहे.
अशाच प्रकारे दक्षिण चीन समुद्रामध्येही चीनने मच्छिमारांचा उपयोग करून घेतला होता, असे चीनविषयीचे अभ्यासक डॉ. ब्रह्मा चॅलेनी यांनी सांगितले. हे चीनचे हस्तक मेंढपाळ आणि गुराखी बनून आजूबाजूच्या परिसरावर देखरेख करत असतात, असेही त्यांनी सांगितले.
मात्र सीमेवरील आपला ताबा वाढवण्यासाठी चीननी भूतानच्या हद्दीमध्ये तीन गावे वसवल्याची छायाचित्रे उपग्रहाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत. 2017 मध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये जिथे तणाव निर्माण झाला होता, त्या डोकलमपासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये पूर्व लडाखच्या भागत ज्यावेळी तणाव निर्माण झाला होता, त्याच वेळी या नवीन गावांचे बांधकाम केले जात होते. पूर्व लडाखमधील लष्करी तणावाच्या पार्श्वभुमीवर दोन्ही बाजूंनी शेकडो सैनिक सीमाभागात तैनात केले गेले होते. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्य 8 फेऱ्या झाल्यानंतरही या तणावावर तोडगा निघालेला नाही.
उपग्रहाद्वारे मिळालेली छायाचित्रे प्लॅनेट लॅब्जमधून उपलब्ध झाली आहेत. 17 फेब्रुवारी 2020 पासून या भागात गाव उभारले जात असल्याचे दिसत आहे. या गावातील झोपड्यांच्या लाल रंगाच्या छतांवरून त्या लगेच लक्षात येतात.
28 नोव्हेंबर 2020 रोजीच्या दुसऱ्या छायाचित्रात आणखी तीन वस्त्या येथे वाढल्याचे दिसते आहे. प्रत्येक वस्तीमध्ये 50 झोपड्या आहेत. प्रत्येक वस्ती दुसरीपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. सर्व वस्त्या कच्च्या रस्त्यांनी जोडलेल्या आहेत. नवीन घरांमध्ये पाणी, वीज आणि इंटरनेट सुविधा आहे.
चीनमधील ग्लोबल टाईम्सने भारतीय सीमेजवळ पायाभूत वाढवल्या जात असल्याचे वृत्त 2017 मध्ये दिले होते. त्यानुसारच अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ ही गावे वसवली जात आहेत.
वादग्रस्त नकाशा…
अरुणाचल प्रदेशच्या सीमा भागातील 65,000 किलोमीटरचा भूभाग चीनच्या नकाशामध्ये दक्षिण तिबेट म्हणून दर्शवण्यात येतो. भारताने अरुणाचल प्रदेशवरील चीनचा दावा फार पूर्वीपासून फेटाळला आहे.
ब्रिटीश प्रशासक सर हेन्री मॅक्मोहन यांनी सिमला ठरावादरम्यान 1914 साली प्रस्तावित केलेली ऐतिहासिक मॅक्मोहन रेषा हीच या भागातील सीमा रेषा आहे, असे भारताचे म्हणणे आहे. भारतीय भूभागाचे तुकडे गिळंकृत करण्याच्या चीनच्या कारस्थानाबद्दल 2017 मध्ये तत्कालिन लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी इशारा दिला होता.