मुंबई -काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही, असे म्हटले जात होते. पण आज मराठी चित्रपट पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे मराठी चित्रपटांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी चित्रपट आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच मनोरंजन क्षेत्रासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित पॅनोरमा ऑनलाईन चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, मनीषा वर्मा, आंचल गोयल, यांच्यासह अशोक राणे, नानू जयसिंघानी, वर्षा उसगावकर, अमित भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
थोरात म्हणाले, आज मराठी चित्रपट गावागावात पोहोचणे आवश्यक असून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑनलाइन माध्यमाचा वापर करून अशा वेगळ्या पद्धतीचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले याचा आनंद होत आहे.
तीन दिवस झालेल्या चर्चासत्रात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आहे. मनोरंजन क्षेत्रासाठी सर्वसमावेशक धोरण ठरवताना या चर्चासत्रातील सूचनांचा विचार केला जाईल. चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी या विषयातील तज्ज्ञांकडून ठोस सूचना मिळतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठी चित्रपट, कला, नाट्य आणि साहित्य क्षेत्र प्रचंड समृद्ध आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटबरोबर आज मराठी चित्रपट स्पर्धा करीत असतो. मराठी चित्रपट निर्मिती, दिग्दर्शित करणारे खूप प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून अनेक संकटांना सामोरे जाऊन वेगळी कलाकृती तयार करण्याचे धाडस दाखवतात याचा आनंद वाटतो. येत्या काळातही आपण वेगवेगळ्या कलाकृती निर्माण कराव्यात, याकरिता राज्य शासन आपल्या पाठीशी आहे, असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.