राहुल गणगे
पुणे -करोनापाठोपाठ अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकरी, नागरिकांना बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कर वसुलीला ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात मार्च ते सप्टेंबर 2020 या कालावधीत ग्रामपंचायत कर 24.85 टक्के तर पाणीपट्टी 23.42 टक्के वसुली झाली आहे. नागरी सुविधा, तीर्थक्षेत्रविकास यासाठी राज्य शासनाकडून कोणताही निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झाला नाही. त्यामुळे विकासकामांचा गाडा रुतला आहे. त्यात जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्याने गावगाड्यातील अर्थकारण ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गावकारभारी हतबल झाले आहेत.
ऐन मार्चअखेरीस करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. सर्वत्र व्यवसाय, व्यापार, जनजीवन ठप्प झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर देखील चांगलाच परिणाम झाला. मागील सहा महिन्यांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची कर वसुली 25 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, आठवडे बाजार लिलाव, व्यावसायिक कर, दुकान गाळे भाडे, औद्योगिक वसाहत कर आदीतून मिळणारा महसूल स्त्रोत सहा महिन्यांपासून ठप्प झाला होता.
या करामधून दैनंदिन कामे, पाणीपुरवठा कर्मचारी वेतन, कंत्राटी कामगारांचे वेतन, किरकोळ साहित्य खरेदी, स्टेशनरी, बांधकामांशिवाय परिस्थितीनिहाय गावात निघणारी तातडीची कामे केली जातात. मात्र, लॉकडाऊन आणि अतिवृष्टीचा फटका ग्रामपंचायतींच्या तिजोरीवर पडला आहे. दरवर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे 80 ते 90 टक्क्यांच्या जवळपास कर वसुली होते. राज्यात टप्याटप्याने व्यवहार सुरळीत होत असले तरी काही प्रमाणात निर्बंध असल्याने पूर्वपदावर येण्यास जानेवारी महिना उजाडणार आहे.
अनलॉकनंतर ग्रामीण भागातील व्यवसाय गती पकडत आहेत. तरीही त्या प्रमाणात ग्राहक बाहेर पडत नाहीत. मागील काळात झालेला कर्जाचा डोंगर, मंदावलेली कर वसुलीमुळे स्थानिक स्वराज्य अर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी कर वसुलीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. प्रशासकांवर तीन ते चार ग्रामपंचायतींचा भार पडल्यामुळे कोणत्या गावांत किती वेळ द्यायचा, यातच दोन महिने गेले आहेत. त्यामुळे करवसुलीवर परिणाम होत आहे.
करोनामुळे ग्रामपंचायतींची करवसुली अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. जनजीवन ठप्प झाले होते. त्यामुळे सर्व अर्थकारण कोलमडले होते. त्याचा परिणाम ग्रामपंचायतींच्या करावर झाला आहे. याबाबत सर्व विस्तार अधिकाऱ्यांची नुकतीच ऑनलाइन बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.
– संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.
करोनामुळे सध्या नागरिकांची अर्थिक परिस्थिती खालावली आहे. उद्योगधंदे बंद असल्यामुळे नागरिकांकडे कर भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे जानेवारीपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. रांजणगाव गणपती परिसरातील व्यवसाय ठप्प झाले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीला अर्थिक फटका बसला आहे. जानेवारी महिन्यापासून ही परिस्थिती सुरळीत होईल.
– सर्जेराव खेडकर, सरपंच रांजणगाव गणपती.