आजवर 28 वेळा केले होते प्लेटलेट दान
पुणे – स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर त्याचे आई-वडील, कुटुंब पुरते खचले आहेत. दहावीमध्ये 91 टक्के गुण मिळवणारा, सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेणारा, दुसऱ्याच्या मदतीला कायम जाणारा आपला मुलगा आत्महत्येचा मार्ग स्वीकारतोच कसा? असा प्रश्न स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांना पडला आहे.
स्थापत्य अभियंता असणाऱ्या स्वप्नीलने “एमपीएससी’ची परीक्षा पास झाल्यावर आपल्याला नोकरी मिळेल, त्यामुळे “तुम्ही घर बांधा, नंतर मी कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला मदत करेल, मला चांगली नोकरी मिळेल’ असे वडिलांना सांगून त्याच्या मनाप्रमाणे घर बांधून घेतले,’ स्वप्निलचे वडील सांगत होते.
“त्याने आजवर 28 वेळा प्लेटलेट दान केले होते. त्याला 100 जणांना प्लेटलेट दान करून त्यांचे जीव वाचवायचे होते. 2 वेळा एमपीएसीचा पूर्व, मुख्य परीक्षा तो उत्तीर्ण झाला, मुलाखतीसाठी एकदा कॉल येईल, त्यानंतर आपण नोकरीला लागू, वडिलांचे कर्ज फेडू, असे त्याला वाटत होते. पण, त्याने हा अचानक आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारला.
माझा मुलगा आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हता, त्याला परिस्थितीने मारले, मी माझ्या मुलासाठी लढणार आहे. काही राजकीय व्यक्तींशी मी बोलालो आहे, आता गप्प बसणार नाही. त्याच्यासारखे इतर मुलांनी करू नये, म्हणून मी लढणार असे स्वप्निलचे वडिल पोततिडकीने सांगत होते.
समाजाने आतातरी विचारसरणी बदलावी
“आज सरकारी नोकरी असणाऱ्यांचा मान-सन्मान मिळतो,’ अशा विचारांनी आपला समाज ग्रासला गेला आहे. त्यामुळे जर एखादी सरकारी नोकरी मिळाली नाही, तर आपलं काही खरं नाही असे विचार तरुणांच्या मनात येत आहेत. त्यातून अनेक उमेदवार स्पर्धा परीक्षा देतात. पण, अर्थचक्र लक्षात घेता नव्या जागा भरण्यास सरकारही हतबल आहे, असंच चित्र आहे.
शासनाच्या धरसोड वृत्तीचा वारंवार बसतोय फटका
स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीच्या प्रक्रियेचा टप्पा ओलांडावा लागतो. त्यानंतर उमेदवारांना तातडीने नियुक्त्या देणे गरजेचे आहे. मात्र, मागील काही कालावधीत परीक्षांचे नियोजनच कोलमडले आहे. परीक्षा सतत लांबणीवरही टाकल्या जात आहेत. परीक्षांसाठीच्या वयोमर्यादेतून काही उमेदवार बाद होऊ लागले आहेत. शासनाच्या विविध आरक्षणाबाबतच्या धरसोड वृत्तीचा फटकाही उमेदवारांना नक्कीच बसतो आहे.
हतबल होऊ नका
सरकारी धोरणांचा परिणाम तरुणांच्या भवितव्यावर झाला आहे. “सरकार जागा भरत नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. आम्हां तरुणांपुढं आता काय पर्याय आहे?’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण, अशा वेळी तरुणांनाही हतबल होण्याची अजिबात आवश्यकता नाही.
एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या करावी
“मंत्र्यांनी मुलांच्या आई-वडिलांचा विचार करावा. एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने खरंच आत्महत्या करावी, म्हणजे त्यांना आई-वडिलांची तळमळ समजेल. त्यांची मुलं सुरक्षित आहेत. त्यांना गरिबांच्या मुलांचं काही घेणं-देणं नाही,’ अशी उद्विग्न भावना स्वप्नीलचे आई-वडील मांडत आहेत.
“एमपीएससी आहे मायाजाल…’ स्वप्निलची सुसाइड नोट
“एमपीएससी मायाजाल आहे. यात पडू नका,’ असे म्हणत स्वप्नीलने लिहलेय की, घेतलेल कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढणाऱ्या अपेक्षा…मी प्रत्येक वेळी कमी पडतोय ही भावना आत्महत्या करण्यामागे आहे.’