पुणे, दि. 18 – प्रवाशांचे प्रश्न वांरवार मांडूनही रेल्वे प्रशासन दखल घेत नाही. नावापुरत्याच बैठका घेत असल्याचे सांगत नऊ खासदारांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. रेल्वेकडून प्रश्न सोडविले जात नसल्यामुळे नऊ खासदार अर्ध्यातूनच बैठकीतून बाहेर पडले. त्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.
मध्य रेल्वेच्या पुणे, सोलापूर विभागातील प्रश्नांबाबत खासदारांसोबत मंगळवारी पुणे विभागाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, ओमराजे निंबाळकर, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, सुधाकर शृंगारे, उमेश जाधव (गुलबर्गा) हे लोकप्रतिनिधी; तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, पुणे विभाग व्यवस्थापक रेणू शर्मा, सोलापूर विभागाचे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे उपस्थित होते.
विभागातील खासदारांसोबत विविध प्रश्नांवर वर्षातून दोन वेळा ही बैठक असते. त्यानुसार मंगळवारी बैठकीत खासदारांनी रेल्वेची स्थिती-समस्या आणि कामांची माहिती दिली. पण, प्रवाशांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याचे सांगितले. “प्रत्येक वेळी मागण्या पूर्ण नाहीत. रेल्वे बोर्डाकडे बोट दाखविले जाते. त्यामुळे अशा बैठकीची गरज काय? जनतेला आम्हांला उत्तरे द्यावी लागतात. तुम्ही जनतेच्या पगार घेऊन काम करता, हे लक्षात ठेवा,’ अशा शब्दांत सुनावत खासदारांची कामे होत नसतील तर अशा बैठकांची गरज काय? असे म्हणतअर्ध्या तासातच खासदार बैठकीबाहेर पडले. त्यांच्या या पवित्र्यामुळे मुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यांनी खासदारांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, सर्व खासदार निघून गेले.
खासदारांनी मांडलेले मुद्दे
करोनापूर्वी सुरू असलेल्या सर्वच ट्रेन सुरू झालेल्या नाहीत.
काही मार्गांवर पॅसेन्जर ट्रेन बंद करून त्यांना एक्स्प्रेसचा दर्जा का दिला? त्यांना सर्वच ठिकाणी थांबे नसल्यामुळे ग्रामीण नागरिकांची ससेहोलपट.
रेल्वे नसल्याने अनेक तरुण-तरुणींचे शिक्षण बंद
करोनापूर्वी सोलापूर विभागाची प्रवासी संख्या
25 लाख होती. आता ती 13 लाखांवर आली
खासदार निंबाळकर यांचा राजीनामा
बैठकीतील वादानंतर रेल्वे विभागीय समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह खासदारांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला. “प्रशासनाने मनमानी कारभार सुरूच ठेवल्याने आपण हा निर्णय घेत आहोत,’ अशी भूमिका निंबाळकर यांनी मांडली.
ग्रामीण भागात पॅसेंजर-लोकल ट्रेन कमी केल्या. याविषयी पाठपुरावा केला. विनंती केली. पण, रेल्वे अधिकाऱ्यांकडून काहीही होत नाही. फक्त मीटिंग घेतात. जुनीच माहिती सांगून मुख्य प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. आम्हाला जनतेला उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे अशा बैठका उपयोगाच्या नाहीत. यामुळे आम्ही बैठकीबाहेर पडलो.
– ओमराजे निंबाळकर, खासदार, उस्मानाबाद