कराची – कराचीमधील तुरुंगात असलेल्या 80 भारतीय मच्छिमारांची आज सुटका करण्यात आली. बेकायदेशीर घुसखोरांची पाकिस्तान सरकारकडून हकालपट्टी केली जाऊ लागली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून या मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे.
हे सर्व मच्छिमार सागरी हद्द ओलांडून पाकिस्तानच्या सागरी हद्दीमध्ये मासेमारी करत असल्याच्या आरोपावरून कराचीमधील मालिर तुरुंगात होते. तेथून सुटका करण्यात आल्यानंतर या सर्व मच्छिमारांना कडेकोट सुरक्षेमध्ये अल्लामा इक्बाल एक्सप्रेसमद्ये बसवून देण्यात आले. ते सर्वजण उद्या (शुक्रवारी) लाहोरला पोचणार आहेत. तेथून त्यांना वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
पाकिस्तानमधील इधी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून या भारतीय मच्छिमारांच्या लाहोरपर्यंतच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. कराचीतील तुरुंगात टाकलेले बहुतेक भारतीय मच्छिमार गरीब कुटुंबातील असून घरी परतत असल्याबद्दल या सर्वांना खुप आनंद झाल्याचे या संस्थेचे पदाधिकारी फैजल इधी यांनी सांगितले.