- सध्या मृत्युमुखी पडणारे, जखमी होऱ्यांचे प्रमाण चिंताजनक
- आजपर्यंत खड्डे बुजविण्यासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च
पुणे – रस्ते अपघात हा गंभीर विषय आहे. आपल्याकडे यात मृत्युमुखी पडणारे, जखमी होऱ्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. 2025 पर्यंत भारतातील अपघातांचे प्रमाण 50 टक्के कमी करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
पुण्यातील “परिसर’ आणि “रोड सेफ्टी नेटवर्क’ या संस्थांतर्फे “रोड सेफ्टी’ या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते. यामध्ये गडकरी यांनी “रस्ते सुरक्षा’ विषयी केंद्र सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत मार्गदर्शन केले.
गडकरी म्हणाले, “रस्ते सुरक्षा हा गंभीर विषय असून, त्यासाठी केंद्रातर्फे विविध प्रयत्न केले जात आहे. आजपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. आगामी काळात “इंटेलिजेन्ट रोड ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर’ विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी पब्लिक-प्रायव्हेट पाटनरशिप या तत्त्वांतर्गत प्रकल्प विकसीत केले जाणार आहेत. महापालिका, राज्य शासन आणि केंद्रीय मंत्रालयाकडून याबाबत प्रकल्प अहवाल मागवले असल्याचेही त्यांनी सांगितले.