जम्मू: जम्मू काश्मीरात आत्तापर्यंत म्हणजे गेल्या सुमारे चार महिन्यात 50 दहशतवादी ठार झाले असून लॉकडाऊनच्या काळात एकूण 18 दहशतवादी मारले गेले आहेत अशी माहिती आज अधिकृत सूत्रांनी दिली. गेल्या चार महिन्यात दहशतवाद्यांकडून एकूण नऊ नागरीकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश ए मोहंमद, लष्कर ए तोयबा, या कट्टर दहशतवादी संघटनेच्या काहीं म्होरक्यांचाही समावेश आहे.
15 मार्च रोजी अनंतनाग जिल्ह्यात दायलगाम भागात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यात लष्कर ए तोयबाचा जिल्हा कमांडर अहमद भट याचाही समावेश होता. जैश ए महंमद संघटनेचा स्वयंघोषित काश्मीर प्रमुख कारी यासिर हा 24 जानेवारी रोजी झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. 23 जानेवारी रोजी त्याचा साथीदार अबु सैफुल्ला उर्फ अबु कासीम हाही मारला गेला आहे.
9 एप्रिल रोजी जैश ए महंमदचा टॉप कमांडर सज्जाद नवाब दर याचा खात्मा झाला आहे. सोपोर येथील चकमकीत तो मारला गेला. 15 जानेवारी रोजी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर हरून वाणी हा टिपला गेला. सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 17 सुरक्षा जवानही शहीद झाले आहेत. त्यातील तीन जण स्पेशल पोलिस ऑफिसर म्हणून कार्यरत होते. सन 2019 च्या संपुर्ण वर्षात काश्मीर मधील िंठकठिकाणच्या चकमकीत एकूण 160 दहशतवादी मारले गेले होते.