नव्या पिढीसाठी व्यासपीठ काढले पाहिजे – एसेम
पुणे, दि. 15 – नव्या पिढीला चारित्र्यसंपन्न करण्यासाठी आम्हा म्हाताऱ्या पुढारी कार्यकर्त्यांनी एखादे व्यासपीठ काढले पाहिजे व त्याची आज नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन समाजवादी ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी यांनी केले.
भू-हिनांसाठी सरकारी घर योजना
औरंगाबाद – भूहीन मजुरांसाठी घरे बांधण्याचे काम पूर्ण करावे, असा आदेश मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आज दिला. भू-हिनांना घर बांधून देण्याचा कार्यक्रम सरकारने आखला आहे. मुख्यमंत्री चव्हाण हे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर प्रथमच मराठवाड्यात आले. चव्हाण यांनी गोदावरीवरील जायकवाडी प्रकल्पाला भेट दिली. ज्वारीचे विक्रमी पीक पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी म्युनिसिपालिटीच्या कार्यक्रमात केले. यानंतर संत एकनाथ महाराज समाधीची पूजा केली.
विश्वचषक हॉकी ः पाकच्या बलाढ्य संघावर भारताची मात
कुआलालंपूर – सुमारे दहा वर्षांनंतर पाकिस्तानच्या महाबलाढ्य हॉकी संघाला धूळ चारून भारताने हॉकी क्षेत्रातील आपले श्रेष्ठत्व पुन्हा प्रस्थापित केले. विश्वचषक हॉकी स्पर्धेत येथील मर्डेका मैदानावर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानच्या संघाला 2 विरुद्ध 1 गोलने हरविले. 1966 नंतर भारताने मिळविलेला हा पहिला नेत्रदीपक विजय होय. सुरुवातीला भारतीय चमूचा खेळ बचावाचाच होता. पण नंतर कौशल्य आणि वेग यांच्या बळावर त्यांनी 45 हजार प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडून पाकिस्तानी संघाला पराभवाच्या खाईत लोटले.
भारताचे नवे लष्कर प्रमुख ले. ज. रैना
नवी दिल्ली – भारताचे नवे लष्कर प्रमुख म्हणून ले. ज. टी. एन. रैना यांची नेमणूक करण्यात आली आहे. ले. ज. रैना हे पश्चिम विभागाचे लष्कर प्रमुख म्हणून काम पाहात होते.