वंदना बर्वे
झोपेला जिंकणाऱ्या अर्जुनाप्रमाणे आपल्या पंतप्रधानांनाही विश्रांतीची अजिबात गरज पडत नसावी, असं त्यांची दिनचर्या बघितली की जाणवतं! चार राज्यांतील विजयाचा आनंदोत्सव सुरूच होता; तोच दुसऱ्या दिवशी गुजरात गाठले. एवढी चपळता आणि उत्साह येतो तरी कुठून?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वाऱ्याची दिशा बदलण्याचं सामर्थ्य आहे, ही बाब पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानं सिद्ध करून दाखविली आहे. दिल्लीच्या बॉर्डरवर वर्षभर चाललेला शेतकऱ्यांचा लढा, करोनाच्या काळात गंगेच्या प्रवाहात तरंगणारे मृतदेह, लखीमपूर हत्याकांड आणि लोकांना भेडसावणारे यासारखे असंख्य मुद्दे मानगुटीवर बसले असताना भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये सत्ता मिळणे ही काही साधी गोष्ट नाही. निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांचे तमाम नेते आपल्या नशिबाला दोष देत बसले नसतील तरच नवल.
परंतु, भाजपला हे यश केवळ जाती-धर्माच्या जोरावर मिळालेलं नाही, ही बाब सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आता, स्वतः पंतप्रधान स्वस्थ बसत नसतील तर पक्षाच्या अन्य नेत्यांची आपल्या सोयीनुसार प्रचार करण्याची हिंमत होईल काय? स्वातंत्र्योत्तर भारतातील आतापर्यंच्या सर्व पंतप्रधानांच्या सरकारी आणि राजकीय दौऱ्यांचा कालनिहाय अभ्यास केला, तर नरेंद्र मोदी नेमके किती तत्त्वांपासून बनले असतील? हा प्रश्न नक्की निर्माण होईल.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या पहिल्या (2014-2019) कार्यकाळात भरपूर जागतिक दौरे केलेत. हे दौरे करताना कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त देशांच्या प्रमुखांना भेटण्याचा किंवा जास्तीत जास्त बैठका घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे दिसून येते. दौऱ्याहून मायदेशी परतताच पुन्हा कामाला लागलेत. त्यामुळे पंतप्रधानांना थकवा जाणवतो की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाभारताच्या काळात अर्जुनाने झोपेवर विजय मिळविला होता. म्हणूनच अर्जुनाला “गुडाकेश’ म्हणतात. अर्थात झोपेला जिंकणारा. अर्जुन मनात येईल तेव्हा झोपू शकत होता किंवा अनेक दिवसांपर्यंत न झोपताही जागा राहू शकत होता. त्यांना थकवा अजिबात जाणवत नव्हता. म्हणूनच अर्जुन अनेक दिवस सलग युद्ध करू शकत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिनचर्या बघितल्यानंतर “गुडाकेश’ अर्जुनाची आठवण झाली नाही तरच नवल!
मोदी-शहांच्या जोडीत योगीचं स्थान?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा सत्ता मिळवून उत्तर प्रदेशच्या राजकारणात स्वतःचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा राज्याची सत्ता मिळविणारे योगी हे यूपीचे पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री ठरले आहेत. यापूर्वी कुणीही सलग दोन वेळा यूपीचे मुख्यमंत्री झाले नाही, असं अजिबात नाही. परंतु, यापैकी कुणीही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. 1985 मध्ये यूपीची सत्ता सलग दुसऱ्यांदा मिळविणारे स्व. नारायणदत्त तिवारी हे शेवटचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर अर्थात 37 वर्षांच्या कालखंडात कुणालाही सलग पुन्हा विजय मिळविता आला नाही. हा विक्रम आता योगी आदित्यनाथ यांच्या नावे झाला आहे. दरम्यान, यूपीच्या या यशानंतर योगी आदित्यनाथ यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली जाऊ लागली आहे. अर्थात, भाजपला सत्ता मिळत राहिली तर मोदी यांच्यानंतर योगी पंतप्रधान होतील, अशी चर्चा आहे. परंतु, हा “जर-तर’चा विषय आहे.
भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर, भाजपशासित राज्याचा मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधानही होऊ शकतो, ही बाब मोदी यांनी सिद्ध करून दाखविली आहे. 2014 पूर्वीपर्यंत, भाजपशासित राज्याचा मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधानही होऊ शकतो, याची कल्पनासुद्धा केली जाऊ शकत नव्हती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्याच नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी व्हायची. परंतु, मोदी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर स्थिती बदलली आहे. योगी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत तर मोदी गुजरातचे तीनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. 2017 मध्ये योगी मुख्यमंत्री झाले. मात्र, हायकमांडच्या मनात दुसरेच नाव होते, हे विसरून चालणार नाही. कदाचित म्हणूनच, पाच वर्षांच्या काळात केंद्रीय नेतृत्वाशी “तू-तू-मैं-मैं’ होत असल्याच्या बातम्या येत होत्या. मध्यंतरी मुख्यमंत्री बदलण्याची सुद्धा चर्चा होती.
पंतप्रधान यांच्यानंतर भाजपमध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्ती कुणी असेल तर ते म्हणजे गृहमंत्री अमित शहा.
आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकाचा नेता म्हणून कुणाचेही नाव घेतले जात नव्हते. मात्र, आता योगी आदित्यनाथ यांचे नाव या तिसऱ्या स्थानी घेतले जाऊ लागले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चर्चा पुढचे पंतप्रधान म्हणून होत असली तरी राजकारणात काहीही स्थिर नसते. सध्या भाजपला ज्या पद्धतीने यश मिळत आहे ते बघून तरी असे म्हटले जाते की मोदी 2024 मध्येही पंतप्रधान होतील आणि 2029 पर्यंत राहतील. यास बराच वेळ आहे. आणि तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल. मात्र, यूपीची सीमा ओलांडून देशाचं राजकारण करायचं असेल तर योगी यांना स्वतःमध्ये बराच बदल करावा लागणार आहे. त्यांचा पहिला कार्यकाळ जसा होता तसाच दुसराही राहिला तर मग राष्ट्रीय राजकारण करण्याच्या स्वप्नावर विरजण पडल्याशिवाय राहणार नाही.
योगी आदित्यनाथ यांनी गेल्या पाच वर्षांत स्वतःला बदललेले नाही. पाच वर्षांपूर्वीही त्यांच्याकडे हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून पाहिले जात होते आणि आजही ते स्वतःला तेच दाखवतात. तसे, बरेच लोक याला त्यांचा यूएसपी म्हणतात. शिवाय, मोदींप्रमाणेच योगी यांचीही स्वतःची फॅन फॉलोइंग आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सोडलेला “अश्वमेध’ सुसाट धावत आहे. एकामागून एका राज्यात कमळ फुलत आहे. गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही राज्ये यास अपवाद ठरली. या राज्यात कॉंग्रेसने मोदींचा अश्वमेध अडविला होता. परंतु, गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश भाजपने बरोबर ताब्यात घेतला. मात्र, जेमतेम जन्माला आलेला आम आदमी पक्ष भाजपला डोईजड ठरणार.