सुसंघटित समाज इतरांचा विचार करीत नाही
पुणे, दि. 26 – देशातील सुसंघटित असा 20 टक्के वर्ग आपल्या किमान गरजा पदरात पाडून घेतो व समाजवादाच्या पोकळ काथ्याकूट करीत बसतो. त्यावेळी तो 80 टक्के असंघटित गरीब जनतेचा विचार करीत नाही, असे विचार अर्थशास्त्रज्ञ डॉ. वि. स. दांडेकर यांनी वसंत व्याख्यान मालेत “लोकशाही समाजवाद’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.
कायद्याचा काटेकोरे अर्थ नको
नवी दिल्ली – कायद्याचा केवळ शाब्दिक अर्थ लक्षात न घेता त्या मागील स्वातंत्र्याची भावना लक्षात घेणे जरूर आहे, असा उपदेश पंतप्रधान इंदिरा गांधींनी केला. न्यायदान कमी खर्चाचे असावे. गरिबांना दावे लढविण्यासाठी सरकारी मदत मिळण्याची योजना तयार होत आहे ती फार चांगली गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या.
कामगार चळवळ संघटित व्हायला पाहिजे
पुणे – हिंदुस्थानातील कामगार चळवळ ही फाटाफुटीने ग्रासलेली आहे. त्यामुळे कामगारांचे प्रश्न सुटू शकत नाहीत. या देशात असंख्य असंघटित कामगार आहेत. या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी कामगार संघटित झाले पाहिजेत, असे उद्गार अखिल भारतीय समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी काढले.
36 वी घटनादुरुस्तीसंसदेत संमत
नवी दिल्ली – सिक्कीमला भारताचे 22 वे घटक राज्य बनविणारी 36 वी घटनादुरुस्ती आज संसदेने संमत केली. राज्यसभेतही ही दुरुस्ती 157 विरुद्ध तीन मतांनी संमत झाली. सिक्कीम गव्हर्नरांना देण्यात आलेल्या खास अधिकाराबाबत काही विरोधी खासदारांनी शंका प्रदर्शित केली होती. त्यांची शंका काही प्रमाणात रास्त होती.