पाकिस्तान काश्मीर प्रश्न सुरक्षा समितीत नेणार!
नवी दिल्ली, दि. 1 – सिमला करारानुसार जर काश्मीर प्रश्न सुटला नाही तर “योग्य वेळी’ पाकिस्तान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत तो उपस्थित करील, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र व संरक्षण खात्याचे राज्यमंत्री अझीझ अहमद यांनी पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत जाहीर केले.
पिंपरी कारखान्यात ऍम्पिसिलिन औषधाचे उत्पादन
पुणे – पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कारखान्यात “ऍम्पीसिलिन’ या औषधाच्या उत्पादनास सुरुवात झाल्याने भारताने सेमिसिंथेटिक पेनसिलिनच्या बाबतीत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या उत्पादनाने भारताचे सुमारे 1 कोटी परकी चलन वाचणार आहे.
“मारुती’ मोटार जुलैमध्ये बाजारात
नवी दिल्ली – भारतीय बनावटीची पहिली छोटी मोटार येत्या जुलै महिन्यात बाजारात विक्रीसाठी येईल हे निश्चत, असे मारुती लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर व पंतप्रधान इंदिरा गांधींचे चिरंजीव संजय गांधी यांनी पत्रकारांना सांगितले. ते पुढे म्हणाले, या महिन्यात शोरूममधून ही गाडी पाहण्यासाठी ठेवण्यात येईल. तिची किंमत 25 हजार रुपये राहील व एक लिटर पेट्रोलमध्ये ती 18 किमी पळू शकते.
शेतकऱ्यांचे कर्ज जोडधंद्याने संपेल
मुंबई – शेतकरी मुद्दाम कर्ज थकवीत नसून त्याला परिस्थिती कारणीभूत असते. अशावेळी शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा, असे एन. एस. पाटील म्हणाले.