“अज्ञानी’ नोकरशहांमुळे ऐतिहासिक कागदपत्रे नष्ट
मुंबई, दि. 31 – बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांतील अनेक महत्त्वाची ऐतिहासिक कागदपत्रे विकली तरी गेली आहेत अथवा जुनी कागदपत्रे नष्ट करून टाकण्याच्या नेहमीच्या सरकारी पद्धतीमुळे नष्ट झालेली आहेत. तामीळनाडूत 1969 ते 1973 या काळात सरकारकडून निरुपयोगी कागदपत्रे निकालात काढण्यात आली. त्यात 86,208 ऐतिहासिक कागदपत्रांचाही निकाल लागला. ब्रिटिश साम्राज्याविरूद्ध बंड करणारा योद्धा कट्टाबोमान आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील पत्रव्यवहाराबाबतची 500 कागदपत्रेही त्यात होती.
आजपासून वर्धा जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी जारी
मुंबई – आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार आश्रमाभोवतालच्या 7 किमी परिसरात उद्यापासून दारूबंदी जारी करण्यात आली आहे. तद्नुसार नवे दारूविक्रीचे परवाने दिले जाणार नाहीत किंवा जुन्याचे नूतनीकरणही केले जाणार नाही.
सूत व कापड गिरण्यांवर मंदीचे संकट आले!
मिरज – सूत गिरण्या व कापड गिरण्या सध्या मंदीच्या लाटेत सापडल्या आहेत. मिरजेतील गिरण्यांत गेल्या अडीच तीन महिन्यांत उत्पादन झालेले सूत व कापड मागणी नाही म्हणून पडून राहिले आहे. हा साठा कोठे ठेवावा, याची पंचाईत पडू लागली आहे.