भावनगर – दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणाबद्दल सध्या आम आदमी पक्षाला जबाबदार धरून भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर आज येथे पत्रकारांशी बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या विषयीची नेमकी स्थिती स्पष्ट केली आहे.
ते म्हणाले की आम्ही उत्पादनशुल्काचे जे नवीन धोरण आखले होते त्यातून राज्य सरकारला चार ते पाच हजार कोटी रूपयांचा अतिरीक्त महसुल मिळाला असता. पण ही योजना राबवण्याच्या दोन दिवस आधी नायब राज्यपालांनी त्यात अनेक बदल केले आणि त्यामुळे योजनेतील महसुलाला बरेच नुकसान सहन करावे लागत होते.
राज्यपालांनी केलेल्या बदलांमुळे दारूची 300 ते 400 नवीन दुकाने सुरू होण्यात अडथळा निर्माण झाला. ती सुरू होंऊ शकली नाहीत.त्यांच्याकडून लायसन्स फी आणि महसूल मिळू शकला नाही. महसुलात तोटा येण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे असे त्यांनी नमूद केले.
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी आम आदमी पक्षाच्या सरकारमुळे उत्पादन शुल्कात बरेच नुकसान झाल्याचा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
पुनावाला यांनी म्हटले होते की आम आदमी पक्षाच्या सरकारच्या या नवीन धोरणामुळे राज्य सरकारला दोन हजार ते तेवीसशे कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. त्या सरकारच्या नवीन मद्य धोरणामुळे राज्याचा महसूल वाढण्याऐवजी मद्यविक्रेत्यांचा नफा वाढणार होता. त्यातून आम आदमी पक्षाला मोठे कमिशन मिळणार होते असा दावाही त्यांनी केला होता.