पुणे (सागर येवले) – “या हृदयाशी त्या हृदयी सूर जुळावे’ असे म्हणत असताना, आज पुणे शहरासह राज्यात अनेक रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. डॉक्टर, माध्यमे यासह सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अवयवदानाबाबत होणारी जागृती विशेषत: हृदय प्रत्यारोपणाबाबतच्या जागृतीमुळे मागील सहा वर्षांत पुणे जिल्ह्यात 39 जणांवर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून जीवनदान देण्यात आले.
जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण 1969 मध्ये दक्षिण आफ्रिकेत डॉ. ख्रिश्चियन बर्नाड यांनी केले होते. याची प्रक्रिया स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध सर्जन डॉ. नॉर्मन शमवेने यांनी प्रमाणित केली होती. दरम्यान, ज्याचा रस्ते किंवा अन्य अपघातात मृत्यू झालेला असेल त्याच ब्रेनडेड व्यक्तीचे हृदय सामान्यपणे रूग्णाला चालते. मात्र, सध्या हृदय दान करणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यातच ठराविक वयोगटातील दात्याचे हृदय प्रत्यारोपण होत असल्यामुळे अनेक गरजू हृदयाच्या प्रतिक्षेत आहेत.
प्रत्यारोपणानंतर रुग्णाला जीवनदान
हृदय प्रत्यारोपणानंतरचे परिणाम चांगले असून, 95 टक्के लोक 1 वर्षाहून अधिक काळ जगतात. 80 टक्के लोक 10 वर्षांहून अधिक काळ जगतात. तो रुग्ण सर्वसामान्य जीवन जगू शकतो, खेळू शकतो. प्रवास करू शकतो, काम करू शकतो. दरम्यान, 30 टक्क्यांहून अधिक रुग्ण प्रत्यारोपण केल्यानंतर 30 वर्षेही जगतात.
हृदय किती वेळ ठेवता येते?
ब्रेनडेड व्यक्तीच्या शरीरातून हृदय काढल्यानंतर तीन तासांमध्ये हृदय प्रत्यारोपण होणे आवश्यक आहे. उशीरा झाल्यावर गुंतागुंत वाढण्यची शक्यता आहे. हृदय काढल्यानंतर हृदयास एकदम थंड स्थितीत ठेवले जाते. शहरातून किंवा अन्य राज्यातून हृदय आणण्यासाठी विमान किंवा ग्रिन कॉरिडॉर करण्यात येते. हृदय आणल्यानंतर रुग्णाला हार्ट लंग मशीनच्या सपोर्टवर ठेवून प्रथम त्याचे आजारी हृदय काढले जाते. त्यानंतर प्रत्यारोपण केले जाते.
हृदय प्रत्यरोपणामुळे जीवनदान मिळते. आजही सह्याद्री रुग्णालयात सात रुग्ण हृदयाच्या प्रतिक्षेत असून, जनजागृतीची आवश्यकता आहे. ब्रेनडेड आणि हृदय चांगले असणाऱ्या व्यक्तीचेच हृदय दान करता येते. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने हृदयदानाबाबत जनजागृती, समुपदेशन करणे आवश्यक आहे.
– डॉ. मनोज दुराईराज, हृदयप्रत्यारोपण तज्ज्ञ