कोल्हापूर – बाल कल्याण संकुलातील 36 मुलांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 14 दिवसांच्या उपचारानंतर ही मुले बाल कल्याण संकुलातील आपल्या घरट्यात पोचली. शिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमधून करोनामुक्त झाल्यानंतर या मुलांनी टाटा, बाय-बाय करत डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांचा निरोप घेतला.
बाल कल्याण संकुलातील एकूण 36 मुले करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 9 मे रोजी 13 मुलांना करोनाच्या संसर्ग झाला होता. त्यानंतर इतर मुलांची चाचणी केल्यानंतर पुन्हा 23 मुले पॉझिटिव्ह आढळली होती.
या मुलांना महापालिकेच्या शिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चौदा दिवसानंतर या 36 मुलांनी करोनावर यशस्वी मात केली. यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यावेळी या मुलांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर आणि नोडल ऑफिसर डॉ. निलेश लांब यांनी विशेष दक्षता घेऊन उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.