नवी दिल्ली – दिल्ली व आसपासच्या भागात दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली असून तब्बल 260 हून अधिक रेल्वे गाड्या त्यामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. धुक्याची समस्या पूर्ण उत्तर भारतात भेडसावत आहे.
पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमार्गे बिहारपर्यंत पसरलेल्या धुक्याच्या दाट थरामुळे सोमवारी सकाळी दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली होती. त्यामुळे 82 एक्स्प्रेस गाड्या, 140 पॅसेंजर गाड्या आणि 40 उप-शहरी गाड्यांसह एकूण 267 ट्रेन रद्द करण्यात आल्या.
काल रविवारी धुक्यामुळे सुमारे 335 गाड्या उशिरा धावल्या, 88 गाड्या रद्द कराव्या लागल्या तर 31 गाड्या अन्य मार्गाकडे वळवण्यात आल्या. काल 33 गाड्या शॉर्ट टर्मिनेट कराव्या लागल्या होत्या.
भटिंडा आणि आग्रा येथे दृश्यमानता शून्य मीटरपर्यंत घसरली. पटियाला, चंदीगड, अंबाला, भिवानी, सफदरजंग, रिज, गंगानगर, वाराणसी, फुरसातगंज आणि भागलपूर येथे 25 मीटर आणि हिस्सार, कर्नाल, पालम, मेरठ, लखनौ, बहराइच आणि पटना येथे 50 मीटर इतकी दृष्यमानता होती.