उरुळी कांचन, (वार्ताहर) – उरुळी कांचन येथील ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी कर थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायत हद्दीत धडक कारवाई सुरू केली आहे. वारंवार आवाहन करूनही कर थकबाकी न भरणार्या थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या नळ जोडण्या खंडित केल्या जात असून आतापर्यंत 25 पेक्षा अधिक नळ जोडण्या तोडण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन व ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांनी दिली.
ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीने अवघा 35 टक्केचा टप्पा गाठलेला आहे. या ग्रामपंचायतीची एकूण घरपट्टी व पाणीपट्टी कर वसुल पात्र रक्कम सुमारे 9 कोटी 15 लाख रुपये असून यासाठी एकूण 9 हजार 507 खातेदार आहेत. आजपर्यंत फक्त सुमारे 3 कोटी 50 लाख रुपये वसूल झाले आहेत. थकबाकीच्या रकमेचा विचार केला तर जास्तीत जास्त 6 लाख 69 हजार व कमीत कमी एक हजार रुपये अशा स्वरुपात खातेदारांकडे आहे.
जर खातेदारांनी थकीत कर भरले नाहीत तर नळ जोड तोडणे, मल निसा:रण, पाइपलाइन बंद करणे अशा कारवाईला नागरिकांना सामोरे जावे लागेल. यशवंत डोळस, ग्रामविकास अधिकारी, उरुळी कांचन,
थकबाकी अदा केल्यानंतर नळजोडण्या पूर्ववत केल्या जाणार असून उरुळी कांचनमधील नागरिकांनी ग्रामपंचायतीला आपल्या कराची थकबाकी त्वरित भरून सहकार्य करावे – भाऊसाहेब कांचन, सरपंच, उरुळी कांचन