सोरतापवाडी, (वार्ताहर) – शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवादिल झाला असून त्यातच सतत जाणार्या विजेमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण गरम झाले असून शेती मालाचे बाजारभाव घसरल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान, व्यापार्यांची सध्या चंगळ असून शेतकर्यांकडून कोंथिबीर दोन रुपयांना खरेदी करून तीच पुढे 10 रुपये तर काही ठिकाणी 20 रुपये विक्री होत आहे. म्हणजे पिकवणारा उपाशी तर विकणारा तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकर्यांना हमखास उत्पन्न मिळवुन देणारे पीक म्हणजे मेथी, कोथिंबीर, वाटाणा, शेपू आदी पिके यांना सुद्धा बाजारभाव नसल्याने शेती कशी करायची या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. दरवर्षी वाटाण्याला ठोक 50 पासुन 100 ते 120 रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळतो; परंतु आता शंभर रुपयात दोन किलो तर काही ठिकाणी अडीच किलो वाटाणा मिळत आहे. तोही व्यापार्यांकडून म्हणजे शेतकर्यांकडून व्यापारी किती रुपयात खरेदी करत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. तोडणीचा खर्च देखील वसुल होत नाही.
मेथीच्या शेकडा जुडीला 300 ते 500 रुपये म्हणजे तीन रुपयाला एक गड्डी तर कोथिंबीर 100 ते 30 रुपये शेकडा आणि शेपूचा पण तोच बाजारभाव आहे. कांदापात पाच तर मुळा सात रुपयाला गड्डी असा बाजारभाव मिळत आहेत. फुलांचे बाजार सुद्धा घसरले आहेत. बिजली 10 ते 15 रुपये किलो, गुलाब गड्डी 8 ते 10रुपयाला गड्डी, गुलछडी 70 रुपये किलो असा बाजारभाव असल्याने शेतकर्यांवर अक्षरशः माल फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी हताश होऊन रिकाम्या हाताने बाजारातून घरी येत आहे.
फूल शेती बंद होण्याच्या मार्गावर
सोरतापवाडी परिसरातील फूल शेती उन्हामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. उन्हाच्या तिव्रतेने झाडे जळून जाऊ लागली आहेत व फुले कोमेजून जात आहेत त्यामुळे सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून उत्पादन खर्च तर सोडाच वाहतुकीचा खर्चासाठी पदरमोड करावी लागत आहे. तरी शासनाने शेतकर्यांप्रती सहानुभूतीने विचार करावा अशी मागणी अनेक शेतकर्यांनी केली .
त्यातच विजेचा लंपडाव
उन्हाळ्यामुळे पिकांना पाणी दुसर्या दिवशी द्यावे लागत असून पाणी दिले तरी पिके कोमेजलेली दिसत आहेत . त्यातच विजेच्या लपंडावाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पिके कशी जगवायची याच्या चिंतेने शेतकरी हैराण झाले आहेत. भाजीपाला काढणीला येईपर्यंत शेतकर्यांच्या हातात फक्त 25 टक्केच शेतमाल शिल्लक राहत असून त्या पटीत बाजार भाव मिळत नाहीत, अशी माहिती शिवाजी कुंजीर, विशाल काळभोर या प्रगशील शेतकर्यांनी दिली.