शेवगाव – जाती व वर्णभेदा पलीकडे जाऊन विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी भारत राष्ट्र समिती हा पर्याय तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे नेतृत्वाखाली उपलब्ध झाला आहे. 2024 च्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्या शेतकऱ्यांचे सरकार आणण्यासाठी सहकार्य करावे. महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचे सरकार आणण्यासाठी निर्धार करावा. शेवगाव-पाथर्डीचे पुढील आमदार शेतकरी नेते संदीप राजळे यांनाच करावे, असे आवाहन करून राज्याचा आगामी मुख्यमंत्री भारत राष्ट्र समितीचाच राहिल, अशी ग्वाही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी दिली.
शेवगाव येथे भारत राष्ट्र समितीच्या शेवगाव मतदारसंघाचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा पक्षाचे राज्य समन्वयक दशरथर सावंत यांचे अध्यक्षतेखाली, कार्याध्यक्ष बाळासाहेब सानप, समितीचे शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे समन्वयक संदीप राजळे यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कदम मार्गदर्शन करत होते.
समन्वयक संदीप राजळे म्हणाले, आजपर्यंत मतदारसंघामधील तीनही साखर सम्राट व प्रस्थापित पुढाऱ्यांनी आलटून पालटून आमदारकी उपभोगली आहे. या दोन्ही तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका होतात, परंतु तीनही साखर सम्राटांच्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध होतात. यामध्येच मतदारसंघाच्या राजकारणाचे गुपित आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुणीही काही बोलत नाही. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर “अबकी बार किसान सरकार’, असा नारा त्यांनी दिला.
यावेळी बीआरएसचे युवा नेते पप्प केदार, आदिनाथ बटुळे मतदार संघ समन्वयक विवेक मोरे, आम आदमी पक्षाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष कृष्णा पांचाळ, सरपंच प्रकाश मगर, सरपंच गोरक्ष केदार, विश्वास मोहिते, अमोल विघ्ने, शरद शिरसाठ, संभाजी ढाकणे, महादेव जवरे, राजेंद्र केदार, प्रताप चित्ते अशोक, शुभम बडे, लतीफ शेख, ओंकार बडाख उपस्थित होते. कार्यक्रमात पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी, सरपंच यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी बाळासाहेब सानप, ऍड जगन्नाथ घुगे, दशरथ सावंत यांचीही भाषणे झाली.
माणिक कदम हे गेल्या २५ वर्षांपासून शेतकऱ्यांशी संबंधित कार्यात आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी नेते शरद जोशी तसेच राजू शेट्टी यांच्या समवेत त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला होता. माणिक कदम हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गेली अनेक वर्ष सक्रिय होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडले. दरम्यान, २०१४ पासून माणिक कदम यांनी ‘मी शेतकरी, आत्महत्या करणार नाही’ हा उपक्रम राबवित आहेत.