गुवाहाटी: आसामच्या विविध भागात आज दरडी कोसळून अथवा मातीचे ढिगारे कोसळून 20 जण ठार झाल्याचा प्रकार घडला आहे. दक्षिण आसामातील बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने हे प्रकार घडले आहेत. कचर जिल्ह्यात 7, हैलाकंदी जिल्ह्यात 7, आणि करीमगंज जिल्ह्यात 6 जण या प्रकारांत दगावले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.
त्यामुळे हे दरडी कोसळण्याचे प्रकार तिकडे घडत आहेत. अनेक ठिकाणी या पावसामुळे झाडे उन्मळून पडणे, घरांची पडझड होणे असेही प्रकार घडले आहेत. आसामच्या उत्तरपूर्वेकडील भागात तर पूर आला असून त्याचा फटका तेथील किमान 3 लाख 72 हजार लोकांना बसला आहे. 348 खेडी या पुराच्या पाण्यात वेढली गेली असून त्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत किमान सहा जण ठार झाल्याचे वृत्त आहे.