वाघोली (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर राज्यातील १११ दिव्यांगांनी एकत्र येत नववर्षाचे स्वागत व स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष करीत साजरा केला. शिवुर्जा प्रतिष्ठान, संभाजीनगर या संस्थेच्या माध्यमातून जिद्दी आणि आत्मविश्वास असलेल्या दिव्यांगांसाठी दरवर्षी ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात येते.
यावर्षीही ३१ डिसेंबर २०२२ व १ जानेवारी २०२३ आयोजित मोहिमेसाठी राज्यातील औरंगाबाद, पुणे, नाशिक, बीड, अकोला, लातूर, बुलढाणा, सांगली, सातारा, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, वाशिम, जळगाव या जिल्ह्यातील अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर, बहु विकलांग, मतिमंदसह सर्व प्रकारच्या १११ दिव्यांगांनी आपला सहभाग दर्शविला.
३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता मोहिमेस सुरुवात झाली. एकमेकांना आधार देत, घोषणा देत, खाच खळगे, डोंगर दऱ्या, वेडी वाकडी वळणे, लोखंडी शिड्या चढाई करीत रात्री ७ पर्यंत सर्व शिखर माथ्यावर पोहोचलो. शिवराय, कळसूबाई आणि राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नावाच्या जयघोषाने सर्व परिसर दणाणला. शिखरावरून नववर्षाच्या स्वागतासाठी आणि उगवत्या सूर्य नारायणाच्या पहिल्या स्वागतासाठी सर्व उत्सुक होते.
तांबडे फुटून नव वर्षाचा सुर्य वर येताच सर्वत्र जयघोष दुमदुमला. सकाळी ९ वाजता सर्वजण शिखर पायथ्याशी रवाना झाले. शिखर मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सर्व शिखर वीरांना शिवुर्जा प्रतिष्ठान अध्यक्ष शिवाजी गाडे यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. या मोहिमेत पुणे जिल्ह्यातून अर्चनामाई घुंडरे (आळंदी शहर/खेड तालुका सक्षम महिलाध्यक्षा, प्रहार संघटना), रघुनाथ सातव (वाघोली), अनिताताई जाधव (पेरणे), किरण शिंपी (वाघोली उपाध्यक्ष, प्रहार जनशक्ती, पक्ष पुणे), सतीश अळकुटे, जान्वी बोत्रे, नवनाथ वरपे यांनी सहभाग घेतला.