नवी दिल्ली – राज्यसभेच्या सर्व 11 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. पश्चिम बंगालमधील सहा, गुजरातमधील तीन आणि गोव्यातील एका जागेवर मतदानाची गरज पडली नाही. पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या उर्वरीत एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत मतदान होणार नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभेसाठी 24 जुलै रोजी मतदान होणार होते.
11 जागांपैकी तृणमूलचे सहा आणि भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. यासह राज्यसभेत भाजपची एक जागा वाढली आहे. आता राज्यसभेत भाजपच्या 93 जागा आहेत. अनंत महाराज हे भाजपचे उमेदवार म्हणून बिनविरोध विजयी झाले आहेत. टीएमसीचे डेरेक ओब्रायन, सुखेंदू शेखर रॉय आणि डोला सेन यांनी पुन्हा टीएमसीकडून वरिष्ठ सभागृहात आपली जागा निश्चित केली आहे. याशिवाय साकेत गोखले, समीरुल इस्लाम, प्रकाश चिक बडाइक हे तृणमूल कॉंग्रेसकडून राज्यसभेवर जात आहेत.
आता कॉंग्रेसची राज्यसभेतील एक जागा कमी झाली आहे. त्याचवेळी भाजपच्या एका जागेत वाढ झाली आहे. भाजप आणि मित्रपक्षांच्या जागा मिळून 105 होतील. भाजपला पाच नामनिर्देशित आणि दोन अपक्ष खासदारांचा पाठिंबा मिळणार हेही निश्चित आहे. अशा प्रकारे सरकारच्या बाजूने 112 खासदार आहेत, तरिही बहुमताच्या आकड्यापासून ते 11 जागा दूर आहेत.
सरकारला बहुजन समाज पक्ष, जेडीएस आणि टीडीपीच्या प्रत्येकी एका खासदाराच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी दिल्लीच्या अध्यादेशाला 105 सदस्य विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत सरकारला बीजेडी आणि वायएसआरसीपीची मदत लागेल. या दोन्ही पक्षांचे 9-9 खासदार आहेत. विधेयक चर्चेसाठी आणि मतदानासाठी आल्यावर सभागृहातच याबाबत निर्णय घेणार असल्याचे बीजेडीने म्हटले आहे. वायएसआरसीपीने अद्याप त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही.