मुंबई – राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे संकट अजूनही कायम आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हजारो हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यभरातील शेतकरी चिंतेत आहेत. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळे मराठवाड्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नांदेडमध्ये गारपीटीच्या तडाख्याने शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या तीन दिवसांत या विभागातील 10 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर 10 जणांचे बळी गेले आहेत. फेब्रुवारीपासून राज्यावर हे अवकाळी संकट ओढावले आहे. भर उन्हाळ्यात एप्रिलच्या 28 दिवसांपैकी 5 दिवस मध्यम ते जोरदार व इतर 14 दिवसांत हलक्या पावसाची नोंद झाली. एप्रिलमध्ये मराठवाड्यात सरासरी 3.6 मिमी अवकाळी पाऊस अपेक्षित असतो. यंदा प्रत्यक्षात 33.6 मिमी म्हणजे 93.03 टक्के पावसाची विक्रमी नोंद झाली.
लातूरच्या तीन मंडळात 65 मिलिमीटर हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर नांदेड (28 मिमी), हिंगोली (14.3 मिमी), उस्मानाबाद (13.9 मिमी), बीड (12.7 मिमी), जालना (7.8 मिमी), परभणी (4.9 मिमी), औरंगाबाद (4.9 मिमी) पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाड्यातील 153 गावांना फटका
अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 153 गावांना फटका बसला आहे. बाधित झालेल्या 153 गावांमध्ये जालन्यातील 101, हिंगोलीतील 38 आणि उस्मानाबादमधील 14 गावांचा समावेश आहे. गेल्या 72 तासांत एकूण 1,178 कोंबड्या, 147 पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे 8058.66 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून 14,441 शेतकरी बाधित झाले आहेत. नांदेडमध्ये 5726.70 हेक्टर, त्यानंतर जालना 2016.96 हेक्टर, हिंगोली 165 हेक्टर आणि परभणी 150 हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे.