- महा-ई केंद्राकडे अर्ज करण्याचे तहसीलदारांकडून आवाहन
पिंपरी – मागील काही दिवसांपासून आकुर्डी येथील सेतू सुविधा केंद्र तांत्रिक अडचणीच्या विळख्यात अडकले आहे. सेतू सुविधा केंद्रामध्ये हायस्पीड इंटरनेट सुविधा नसल्यामुळे एक दाखला अपलोड होण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटांचा वेळ लागत आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील महा ई केंद्रात अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार गीता गायकवाड यांना करावे लागले आहे. तांत्रिक अडचणींमुळे पुढील काळात विद्यार्थ्यांनी दाखले मिळविण्यासाठी सेतू सुविधा केंद्राऐवजी आपल्या परिसरातील महा-ई केंद्राकडे अर्ज करावेत, जेणे करुन त्यांना वेळेत दाखले मिळतील, असे आवाहन तहसीलदार गीता गायकवाड यांनी केले आहे.
उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रहिवाशी, उत्पन्न, नॉन क्रीमीलेयर, आदी प्रमाणापत्राची आवश्यकता असते. ही प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना सेतू सुविधा केंद्रामधून मिळत असतात. त्यामुळे दरवर्षी मार्च ते जुलै या दरम्यान विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी नागरिक सेतू सविधा केंद्रामध्ये विद्यार्थी गर्दी करीत असतात. यावर्षीही परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या आकुर्डी प्राधिकरणातील सेतू सुविधा केंद्रामध्ये तांत्रिक अडचणीमुळे दाखले देण्यासाठी उशीर होत आहे.
सेतू सुविधा केंद्रामध्ये हाय पॉवर इंटरनेट सुविधा नसल्यामुळे सध्या या सेतू सुविधा केंद्राचे कामगार डोंगलच्या सहाय्याने करण्यात येत आहे. त्यामुळे, येथील इंटरनेटची स्पीड अत्यंत कमी झाली असून एक अर्ज अपलोड करण्यासाठी 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे, केंद्राबाहेर रांगा लागत आहेत. सध्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा कालावधी सुरु आहे. त्यामुळे आजघडीला दाखले काढण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी असतानाही लवकर दाखले मिळत नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
आता पुढील तीन महिने नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता सेतू सुविधा केंद्रामधून दाखले काढण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे तहसीलदारांनी विद्यार्थ्यांना आपले दाखले जवळच्या महा-ई केंद्रातून काढावे, असे आवाहन केले आहे.
नागरिकांनी आपल्या पाल्याचा दाखला वेळेत मिळावा, यासाठी आपल्या भागातील महा-ई सेवा केंद्रामध्ये अर्ज करावेत. त्यामुळे विहीत मुदतीत पालकांना प्रशासनाकडून त्यांचा दाखला मिळेल. महा ई सेवा केंद्रात अर्ज केल्यामुळे सेतू सुविधा केंद्रात गर्दी होणार नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाहीच शिवाय प्रशासनाचाही ताण कमी होईल.
– गीता गायकवाड, तहसीलदार, पिंपरी-चिंचवड