नवी दिल्ली – दिल्ली दंगलीबद्दल कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेवर आता भारतीय जनता पक्षाने आगपाखड सुरू केली आहे. त्या पक्षाचे प्रवक्ते व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे की सोनियांनी आम्हाला राजधर्म शिकवू नये त्यांनी या विषयी त्यांच्या पक्षाचे रेकॉर्ड तपासून पहावे. तुमच्या सरकारच्या काळात देशात मोठ्या दंगली झाल्या आहेत. तुमच्या मतपेढीच्या राजकारणामुळे देशाचे वातावरण खराब झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीतील भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या वक्तव्याबाबत मात्र त्यांनी सारवासारव करीत त्या वक्तव्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला.
भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळेच दिल्लीतील दंगलीना सुरूवात झाल्याचा आरोप गेले काहीं दिवस होत आहे त्या संबंधात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की आम्ही कपिल मिश्रा यांनी केलेले वक्तव्य मान्य करीत नाही. त्यांच्या या प्रकारच्या वक्तव्यांना आमचा पाठिंबा नाही.
दिल्लीतील दंगलींबाबत गृहमंत्री अमित शहा हे पहिल्या दिवसापासूनच तेथील स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत होते असा दावाही त्यांनी केला. दिल्लीतील दंगलींबाबत जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
दिल्ली दंगलींचे कॉंग्रेसकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप करून ते म्हणाले की अशा संवेदनशील प्रसंगी आपण सर्वांनीच मिळून परिस्थिती कशी आटोक्यात येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
दिल्लीतल्या दंगलीत निष्क्रीयता दाखवल्याबद्दल अमित शहा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने काल राष्ट्रपतींकडे केली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रपतींनी आपला राजधर्म पाळावा अशी मागणी या नेत्यांनी केली होती. त्याचा संदर्भ देत रविशंकर प्रसाद यांनी ही सुचना केली.