- महापालिकेकडून मास्टर प्लॅन तयार
- भौगोलिक रचननेनुसार नियोजन
पिंपरी – शहरातील मलनि:सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त पाण्यावर पुढील प्रक्रिया करून शहरातील औद्योगिक तसेच निवासी भागात प्रतिदिन 120 दशलक्ष लिटर एवढ्या प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. सल्लागारामार्फत त्याबाबतचा विस्तृत आराखडा तयार (मास्टर प्लॅन) करण्यात आला आहे. या मास्टर प्लॅनमध्ये शहराच्या भौगोलिक रचनेनुसार पाण्याच्या पुन:वापरासाठी चार भाग केले आहेत.
शहरामध्ये दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर विविध मलनि:सारण केंद्राद्वारे प्रक्रिया केली जाते. या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त पाण्यावर पुढील प्रक्रिया करून शहरातील औद्योगिक तसेच निवासी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी सल्लागाराने विस्तृत आराखडा तयार केला आहे. पाण्याचे पुन:वापर आणि पुर्नचक्रीकरण करण्याच्या विस्तृत धोरणास तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी पीपीपी किंवा एचएएम मोड-1 नुसार करण्याच्या प्रस्तावास मंजुरी प्राप्त आहे. सल्लागाराने तयार केलेल्या मास्टर प्लॅनमध्ये शहराच्या भौगोलिक रचनेनुसार चार भाग करण्यात आले आहेत.
भाग एकमध्ये पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी, चिंचवड एमआयडीसी आदींचा समावेश आहे. भाग 2 मध्ये चिखली एमआयडीसीच्या भागाला समाविष्ट केले आहे. निगडी-प्राधिकरण व तळेगाव एमआयडीसी हा परिसर भाग तीनमध्ये घेण्यात आला आहे. तर, भाग चारमध्ये चाकण एमआयडीसीचा अंतर्भाव केला आहे. या आराखड्यानुसार शहरासाठी दररोज 120 दशलक्ष लिटर एवढ्या प्रक्रियायुक्त पाण्याचा पुन:वापर केला जाऊ शकतो. मास्टर प्लॅनपैकी पहिल्या टप्प्यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत एरिया बेस्ड डेव्हलपमेंटमधील पिंपळे सौदागर तसेच वाकड, हिंजवडी एमआयडीसी परिसर आदींसाठी कासारवाडी मलनि:सारण प्रक्रिया केंद्रातून दररोज 75 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. तथापि, शहरासाठी विस्तृत आराखड्यामधून महापालिका हद्दीबाहेरील हिंजवडी भागासाठी एमआयडीसीकडून अद्याप सामंजस्य करार (एमओयू) झालेला नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत संबंधित भाग पहिल्या टप्प्यामधून वगळण्यात येणार आहे. त्याऐवजी शहरातील पाण्याची टंचाई असणाऱ्या भागाचा समावेश करून प्राधान्यक्रमात बदल करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार शहरातील वेगाने वाढणाऱ्या चिखली व चऱ्होली या दुसऱ्या टप्प्यातील भागाचा समावेश प्राधान्याने पहिल्या टप्प्यात करण्याच्या प्रस्तावास मान्यता घ्यावी लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात तुटवडा असलेले भाग
शहराच्या वाढीचा वेग आणि पाण्याचा तुटवडा असलेल्या भागांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यानुसार, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, चिंचवड, चिखली, चऱ्होली व एमआयडीसी क्षेत्रात कासारवाडी येथून 75, चिखलीमधून 20 आणि चऱ्होली येथून 5 दशलक्ष लिटर याप्रमाणे दररोज एकूण 100 दशलक्ष लिटर इतके पाणी पुन:चक्रीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यापैकी सुमारे आठ एमएलडी पाणी पिण्याच्या गुणवत्तेचे शुद्ध करण्यासाठी आरओ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. प्रक्रियायुक्त पाण्याच्या पुर्नवापरासाठी आवश्यक त्या ठिकाणी आराखड्यानुसार सुमारे 306 किलोमीटर जलवाहिन्यांचे प्राथमिक जाळे तयार केले जाणार आहे. वाकड, पिंपळे सौदागर, कासारवाडी एमआयडीसी, चिखली आणि चऱ्होली अशा पाच ठिकाणी एक ते पाच दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 654 कोटी इतका खर्च अंदाजित आहे. त्यास प्रशासकीय मान्यता घेतली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव येत्या 20 तारखेला होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.