पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “कॉम्प्युटर सायन्स’ विषयाच्या तिसऱ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत एक मुद्दा (बीट) “इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ या विषयातील आला होता. याबाबत परीक्षा विभागाने दोन्ही विषयांबाबत संबंधितांकडून खुलासा मागवला आहे. यामध्ये काही चूक आढळून आल्यास पेपर सेट करणाऱ्यांवर विद्यापीठाच्या नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग परीक्षेत तृतीय वर्षाच्या आयटी शाखेची “थेअरी ऑफ कम्प्युटेशन’ विषयाची प्रश्नपत्रिका “जैसे थे’ तृतीय वर्षाच्या कॉम्प्युटर शाखेच्या थेअरी ऑफ कम्प्युटेशन विषयासाठी देण्याचा अनागोंदी प्रकार शुक्रवारी घडला होता. “कॉम्प्युटर सायन्स’ आणि “इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ या दोन्ही विषयांची नावे एकसारखी असली तरी, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके वेगळे आहेत. त्यामुळे कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविण्यात प्रचंड अडचणी आल्या. विद्यार्थी तृतीय वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रक्रियेतमध्ये सहभागी होण्यासोबतच नामांकीत आयटी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यावर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.
दरम्यान, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सातत्याने चुका होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान होत आहे. तरी देखील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या गैरकारभारावर अंकुश ठेवण्यात विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे परीक्षा विभागाच्या संचालकावर तसेच दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना “मिस्ड कॉल’ अभियान राबवून आक्रमक आंदोलनाची भूमिका घेणार आहे. त्यासाठी संबंधित क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सहभाग नोंदविण्याचे आवाहन “मनविसे’ने केले आहे.