जनतेशी थेट संबंधित खाती न मिळाल्याची भावना
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त तोंडावर आला असतानाच प्रदेश कॉंग्रेसची खातेवाटपाबाबतची नाराजी उघड झाली आहे. एवढेच नव्हे तर, ती नाराजीही प्रदेश कॉंग्रेसने पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचवली आहे.
कॉंग्रेसच्या वाट्याला महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि इतर खाती आली आहेत. मात्र, आपल्या वाट्याला आलेली बहुतांश खाती जनतेशी थेट संबंधित नाहीत. त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ शकते, अशी भावना राज्यातील कॉंग्रेस नेत्यांची बनली आहे.
कॉंग्रेसला कृषी, सहकार, उद्योग, गृहनिर्माण आणि ग्रामविकास यांपैकी किमान दोन खाती हवी आहेत. गृह, अर्थ आणि नगरविकास खात्यांचे राज्यमंत्रिपद मिळण्याबाबतही पक्ष आग्रही आहे.
कॉंग्रेसला सरकारमध्ये हवी तशी भागीदारी मिळाली तरच सत्तेचा समतोल साधला जाईल, असे त्या पक्षाच्या सुत्रांनी नमूद केले. कॉंग्रेसच्या स्थापना दिनी (28 डिसेंबर) होणाऱ्या कार्यक्रमासाठी पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईत येणार आहेत.
त्यावेळी त्यांच्यापुढे प्रदेश कॉंग्रेसचे नेते संबंधित मुद्दा उपस्थित करणार आहेत. कॉंग्रेस मंत्र्यांची यादी निश्चित झाली नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे आधीचे वृत्त होते. आता ऐन विस्ताराच्या तोंडावर कॉंग्रेसमधील नाराजी समोर आली आहे.