सातारा – जिल्ह्यात घरे, दुकाने व शाळांना लक्ष्य करून रात्री चोऱ्या करणाऱ्या टोळीतील अक्षय मारुती गायकवाड, अविनाश बाबासाहेब चव्हाण (रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव), विष्णू प्रकाश जठार (रा. टकले बोरगाव, ता. कोरेगाव), संतोष यशवंत घोरपडे (रा. चोरगेवाडी, ता. कोरेगाव) व सुशांत दत्तू लोकरे (रा. चोराडे, ता. खटाव) या संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबात माहिती अशी, उंब्रज, औंध, पाटण, बोरगाव, रहिमतपूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरे, दुकाने व शाळांमधील साहित्य चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी संबंधित पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थागुशाचे पथक चोरट्यांच्या मागावर होते.
हे संशयित रहिमतपूर परिसरातील हॉटेलांमध्ये रोज पार्टी करत होते. ते काहीच कामधंदा करत नसल्याने स्थानिक नागरिकांना त्यांचा संशय आला. त्यांच्यापैकी काहींनी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना या संशयितांची माहिती दिली. पाटील यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार तानाजी माने, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे,
राजू ननावरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, नितीन भोसले, विक्रम पिसाळ, विशाल पवार, मोहसीन मोमीन, संजय जाधव, विजय सावंत, पंकज बेसके यांनी संशयितांना पकडून चौकशीसाठी एलसीबी कार्यालयात आणले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता उंब्रज, औंध, पाटण, बोरगाव, रहिमतपूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बारा घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी नऊ संगणक, एक प्रोजेक्टर, दोन स्कॅनर, तीन सीपीयू, शेतीत फवारणी करण्याची औषधे, असा मुद्देमाल जप्त केला आहे. संशीयतांना पुढील कारवाईसाठी रहिमतपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.