अतिवृष्टीसह दुष्काळ निवारणाचे प्रयत्न : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सातारा,दि.4 (प्रतिनिधी)-
जिल्ह्याच्या पुर्वेला दुष्काळ तर पश्चिमेला अतिवृष्टी अशा दोन्ही आपत्तींचे निवारण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल सक्षमपणे पार पाडत आहेत. सद्यस्थितीत पुर्वेच्या दुष्काळापेक्षा पश्चिमेकडील अतिवृष्टीचे संकट भयानक असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्ती निवारणाचे काम प्रशासन चोखपणे पार पाडत आहे. मात्र, नागरिकांनी आपल्या जीवाची काळजी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषद आयोजित करून प्रशासनाने आपत्ती निवारणासाठी केलेली तयारी व नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. त्यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एस.एस.भागवत यांच्यासह विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, जिल्ह्याच्या पश्चिमेकडे अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस होत आहे.
पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून सद्यस्थितीत सर्वच धरणांमध्ये पावसाच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणांमध्ये 90 टक्के पाणीसाठा नियंत्रित करून उर्वरित पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर विसर्गाचे प्रमाण वाढविण्यात येणार असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. नदीकाठी अतिक्रमित घरे रिकामी करण्याचे काम प्रशासन करित आहे. त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था गावातील मंदिरांमध्ये करण्यात येणार आहे.
तरी धोकादायक ठिकाण निश्चित केलेल्या नागरिकांनी स्वत:हून स्थलांतरित होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ज्या पुलांवरून पाणी वाहत आहे असे पुलावरून नागरिकांनी पायी अथवा वाहने नेवू नयेत. तसेच नदीचे पाणी पाहण्याचे चित्र चांगले असले तरी अशा धोकादायक ठिकाणी नागरिकांनी जावू नये. जिल्ह्यातील घाट परिसरात दरडी कोसळण्याची देखील शक्यता असून नागरिकांनी विनाकारण घाटपरिसरातून प्रवास करू नये. आवश्यकता असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक निश्चित केले आहेत. त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालय 02162- 232349, पोलीस विभाग 02162- 233833, जलसंपदा विभाग 02162-244681 व 244481, सार्वजनिक बांधकाम विभाग 02162- 234989, वीज वितरण 02162- 244640 व 7875768554 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
——————————————————————————————-
पालकांनी सतर्क राहावे
दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिमेला अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकांनी पावसाचा जोर पाहूनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घ्यावा. अतिवृष्टी असेल तर पालकांनी विद्यार्थ्यांना एक दिवस सुट्टी दिली शिक्षणावर फारसा परिणाम होणार नाही. तेव्हा पालकांनी देखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे पाणी उकळून प्यावे तसेच बाहेरील खाद्य पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.