- लॉकडाऊनचा परिणाम; माहेरवासिणीची यंदा सासरीच होणार “आखाजी’
पिंपरी – साडेतीन मुहर्तापैकी एक असलेला व पूर्वजांचे स्मरण करण्याची शिकवण देणार अक्षयतृतीयेचा सण अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने या उत्सवावार सावट निर्माण झाले आहे.
वैशाख शुद्ध तृतीयेला येणाऱ्या अक्षयतृतीयेला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. 26 एप्रिल रोजी अक्षयतृतीयेचा सण आहे. ग्रामीण भागात यास आखाजी असे म्हणतात. या दिवशी कृत युग संपून, त्रेता युगाला सुरुवात झाली असे मानले जाते. हा पुर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पुरणपोळी, आमरसाचे भोजन, पितरांचे नावाने आगारी वैश्वदेव, वसंत माधव देवतांचे स्मरण करत घागरींचे पूजन केले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ “अक्षय’ मिळते असे मानले जाते. तसेच या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले जाते.
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करुन त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्ष्य होते. या दिवशी माहेरवाशीण माहेरी येत असतात. मात्र करोनाच्या संकटामुळे सर्वच घटकांवर पाणी फेरले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार ठप्प झाला आहे. त्यामुळे सण-उत्सव घरगुती स्वरुपात साजरा होताना दिसत आहेत तसाच अक्षयतृतीयेचा सणही साजरा होणार हे निश्चित.
दिलेले दान राहते अक्षय्य
साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहर्त असलेल्या अक्षयतृतीयेला तीलतर्पण करणे, मृतिकापूजन करणे अशा प्रथा आहेत. या तिथीला विशेष महत्त्व आहे. स्नान, श्री विष्णुची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण करण्याची पद्धत आहे. अक्षयतृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही, अशी आख्यायिका आहे.