प्रशांत जाधव
सातारा – पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा व पोलीस उपविभागाचा क्राइम ऑफिसर म्हणून ओळखऱ्या जाणाऱ्या दहीवडी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे वडूज येथील कार्यालय दहिवडीला स्थलांतर करण्याचा घाट घातला आहे. हे कार्यालय केवळ भाड्याच्या इमारतीत असल्याचे निमित्त करून लोकप्रतिनिधींनी हे कारस्थान रचल्याने आणि प्रशासनाने कोणताही विचार न करता त्यांच्या “हो’ला “हो’ केल्याने खटाव तालुक्यातील जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. फलटण उपविभागातून वेगळा झाल्यानंतर दहिवडी उपविभाग अस्तित्वात आला.
त्यावेळी प्रांत व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दहिवडीला सुरू करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दहीवडी, वडूज कॅम्प, असे नामकरण करून उपअधीक्षकांचे कार्यालय वडूज शहरात वाकेश्वर रोडवर एका भाड्याच्या इमारतीत हलविण्यात आले. तेव्हापासून गेली सोळा वर्षे हे कार्यालय वडूज येथेच सुरू आहे; परंतु हे कार्यालय केवळ भाड्याच्या इमारतीत असल्याचे आणि लोकांना पायऱ्या चढून येण्याचा त्रास होत असल्याचे कारण पुढे करून लोकप्रतिनिधींनी हे कार्यालय दहिवडीत स्थलांतरीत करण्याचा घाट घातला आहे. पोलीस व महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही लोकप्रतिनिधींची “री’ ओढल्याने खटाव तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
त्यातच हे कार्यालय दहिवडी येथे पोलीस दलाच्या मालकीच्या इमारतीत सुरू केले जाणार असेल, तर ते समजण्यासारखे आहे; परंतु तेथेही ते भाड्याच्याच बंगल्यात जाणार असेल, तर या स्थलांतरामागचा हेतू स्वच्छ नाही. बरे, लोकांना पायऱ्या चढण्याचा त्रास होतो, असे म्हणणे असेल तर मग, जिल्हा मुख्यालयात पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात जातानाही दोन जिने चढावे लागतात. त्या न्यायाने पोलीस अधीक्षक कार्यालयाचेदेखील स्थलांतर करायचे का? या मागचा बोलाविता धनी कोण? कोणाच्या बालहट्टापायी हा डाव रचला गेला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दोन तालुक्यांमध्ये भांडण लावू नका
दहिवडी उपविभागीय कायांलय, अशी नोंद शासन दप्तरी असली तरी हे कार्यालय अनेक वर्षे वडूज येथे सुरू आहे. त्यामुळे आजवर कोणाला त्रास झाल्याचे ऐकिवात नाही; परंतु लंगड्या सबबी पुढे करून प्रशासनाने माण व खटाव या तालुक्यांमधील जनतेत भांडणे लावायचा उद्योग करू नये. दहिवडी येथे राखीव असलेल्या 35 गुंठे जागेत प्रशस्त इमारत बांधली जाईल, तेव्हा स्थलातंराचा विचार करावा, अशी भावना व्यक्त होत आहे.