नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या चालू आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार समर्थन केले आहे.
आर्थिक शिस्त कायम ठेवून भारताला हा अर्थसंकल्प पुन्हा विकासाच्या महामार्गावर घेऊन जाणारा असल्याचे जेटली यांना वाटते. जेटली यांनी म्हटले आहे की, सरकारने अतिशय प्रामाणिकपणे हा अर्थसंकल्प तयार केला आहे. जनतेला पुरेशा सवलती देण्याबरोबरच भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत.
यामुळे अशावादी तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करणारा नवा भारत निर्माण होणार आहे. मध्यमवर्ग या अर्थसंकल्पामुळे आनंदात असणार आहे. कमी दरांच्या घरांना आणखी चालना दिलेली आहे. त्याचबरोबर नव्या युगाच्या तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रीक वाहनासाठी योग्य सवलती देण्यात आलेल्या आहेत.
अगोदरच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी सुरू ठेवलेल्या योजना आताही कायम करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. पायाभूत सुविधा बांधकाम या क्षेत्राला चालना दिल्यामुळे भांडवली गुंतवणूक वाढून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे भारत पुन्हा जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था होणार असल्याचा दावा जेटली यांनी केला आहे. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात सरकारच्या या धोरणामुळे भारताचा विकास दर 7.3 टक्के इतका राहिलेला आहे. त्याचबरोबर अर्थमंत्र्यांनी चालू आर्थिक वर्षात तूट 3.4 टक्क्यांऐवजी 3.3 टक्के ठेवण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. ही बाब स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.