तालुक्याती सात गावांतील शेतकऱ्यांचा संताप; सुचना आणि हरकती मागविल्या पण तहसिलकडे नकाशाच नाही
सासवड- महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने पुरंदरच्या आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आराखड्याचा नकाशा जाहीर करण्यात आला असुन या विषयी 60 दिवसांत सुचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नकाशा जाहीर करताना विमानतळ बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही. तसेच, ज्या नकाशावर सुचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत तो नकाशाच पुरंदर तहसील कार्यालयात उपलब्ध नाही. याविरोधात आज विमानतळ बाधितांनी एकत्रित येत सासवड येथील शिवतीर्थ ते पुरंदर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील 2832 हेक्टर क्षेत्रावर शासनाने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच शासनाने बहुतेक सर्वच परवानग्या मिळविल्या असून मागील काही दिवसांपूर्वी प्रत्येक विमानतळ बाधीत गावांमधील कोणकोणत्या दिशेचे क्षेत्र जाणार आहे त्यांचे गट नंबर्स प्रसिद्ध केले होते. आता, परस्पर विमानतळाचा नकाशाच जाहीर केला आहे. त्यामुळे आमच्याबरोबर शासनाने कोणतीही चर्चा न करता गट नंबर जाहीर केलेच कसे? आणि नकाशा जाहीर केलाच कसा? असा सवाल विमानतळ बाधितांनी उपस्थित केला आहे.
विमानतळ प्रकल्पाच्या घोषणा होत असताना स्थानिक ग्रामस्थांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात शासनाविरोधात तीव्र असंतोष उफाळून येत आहे. काही दिवसांपूर्वीच कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, खानवडी तसेच मुंजवडी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेवून शासनाचा जोरदार निषेध केला होता. आजही सासवड येथील शिवतीर्थावर विमानतळ बाधितांनी एकत्रित येत मुख्य बाजारपेठेतून मोर्चा काढला. मोर्चात महिलांची संख्या अधिक होती, विमानतळ बाधितांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून हातात काळे झेंडे, विमानतळाचा विरोध दर्शविणारे फलक घेतले होते. इडा पिडा टळू दे पुरंदरचे विमानतळ जळू दे…, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची.., हम लढेंगे भी और जितेंगे भी… अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
शासनाने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांना विश्वासात घेवू असे सांगत असताना दुसरीकडे मात्र दररोज नवनवीन आदेश काढीत आहे. त्यामुळे आम्ही काय समजायचे? त्यामुळे ज्यांना वाटते विमानतळामुळे विकास होणार आहे, त्यांनी त्यांच्या जागेत ते उभारावे, आमची त्यास हरकत नाही.
शासनाचा निर्णय जनतेवर अन्याय करणारा असून त्यामुळे ज्या जमिनी प्रकल्पात जाणार नाहीत, त्या ठिकाणी वेगवेगळे आरक्षण पडणार असल्याने त्या ठिकाणी राहूनही फायदा होणार नाही. प्रकल्पाच्या बाहेरील जमिनी मधून वेगवेगळे झोन आणि मोठमोठे रस्ते विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वच बाजूने आम्हाला अडचणीत आणण्याचे काम शासनाकडून सुरु आहे. शासनाने आमच्यावर जबरदस्ती केली तर शासनाला त्याची किंमत मोजावी लागेल. तसेच, यापुढे आरपारची लढाई केली जाणार असून शासनाने जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास थेट न्यायालयाचा दरवाजा खटखटावा लागणार आहे. त्यामुळे बाधीतांन तशी तयारी ठेवावी, असे आवाहन विमानतळ विरोधी कृतीसमितीने केले आहे.
- आमदार शिवतारे विरोधात सूर…
पुरंदरच्या आमदारांनी कितीही जोर लावला तरी आमच्या शरीरातील रक्ताच्या शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत आमचा विमानतळास विरोध राहील. पुरंदरच्या विकासाच्या नावाखाली पुरंदरचे आमदार तालुका भकास करण्याच्याच मागे लागल्याचे दिसून येत आहे. पुरंदरच्या शेतकऱ्यांना पुरंदर उपसा सिंचननचे पाणी देण्यापासून वंचित ठेवले जात असून विमानतळाकरिताच पुरंदरची शेती विकसित होऊ दिली जात नाही. आमदारांना तालुक्यातील जनतेला आजपर्यंत पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी, सुशिक्षित तरूणांना रोजगार, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देता आलेला नाही. खोटी आश्वासन देऊन आमदारकी आणि मंत्रीपद मिळविले आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. आमदारांनी विमानतळ हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे, कोणत्याही परिस्थितीत पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ करणारच असे त्यांनी वारंवार आपल्या भाषणांमधून ही सांगितले आहे. मात्र, विमानतळ बाधित सातही गावांमधील बाधितांनी विजय शिवतारे यांचा जाहीर निषेध केला असून मुंबईचे पार्सल मुंबईलाच परत पाठवणार, अशी प्रतिक्रिया आंदोलक शेतकऱ्यांतून उमटत होती. - नवरदेव वऱ्हाडासह मोर्चात…
कुंभारवळण येथील अनिकेत कामठे याचे आज लग्न होते. मात्र, आधी लगीन विमानतळ विरोधाचे नंतर माझे, असे म्हणत नवरदेव अनिकेत पोशाखातच मोर्चात सहभागी झाला, अशा प्रकारे लग्न समारंभ सोडून आंदोलनात सहभागी होणाऱ्या नवरदेवाची चर्चा आहे. यातून पुरंदर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांची विमानतळ विरोधाची धार अतिशय तीव्र असल्याचे जाणवले. - विमानतळाच्या नकाशाची होळी…
पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जाहीर केलेल्या नकाशाची प्रत पुरंदर तहसील मध्ये उपलब्ध नाही. मात्र, विमानतळ विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून ही प्रत आणली व आजच्या मोर्चा प्रसंगी पुरंदर तहसील समोरील प्रांगणात आराखड्याचा या प्रतीची होळी करण्यात आली व विमानतळाच्या आराखड्याचा आणि शासकीय हुकूमशाहीचा तीव्र निषेध करण्यात आला.