नवी दिल्ली – आपल्या क्रिकेट करिअरमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघाला अनेक महत्वपूर्ण सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगने आज आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी तो या पुढे परदेशी क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. आपल्या निवृत्तीच्या घोषणेवेळी त्याने ही माहिती दिली असून केवळ मौज म्हणून तो अशा स्पर्धांमध्ये भाग घेईल. युवीच्या या निर्णयायामुळे त्याच्या चाहत्यांना निवृत्तीनंतरही त्याचा खेळ पाहता येणार आहे मात्र त्यासाठी त्यांना परदेशी लीग स्पर्धा पाहाव्या लागणार आहेत.
युवराज सिंगच्या परदेशी लीगमध्ये खेळण्याच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्राने सांगितले की, “युवराजने आयपीएलमधून देखील निवृत्ती घेतली असल्याने त्याला अशा स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही.”
२०११च्या क्रिकेट विश्वचषकात युवीने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत भारतीय संघाला विश्वचषक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. २०११च्या विश्वचषकामध्ये भारतीय संघाच्या मधल्या फळीची धुरा भक्कमपणे सांभाळताना युवराजने ३६२ धाव ठोकल्या होत्या तर गोलंदाजीमध्ये देखील कमाल दाखवत त्याने मालिकेत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये १५ बळी मिळविले होते. त्याला त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळेच ‘मालिकावीर’ या सन्मानाने देखील गौरविण्यात आले होते. युवराज सिंगच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
.