- शेतकऱ्यांनी ठेवेले बियाणे सुकायला
पेठ – मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची बटाटे लागवडीसाठी लगबग सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी बटाट्याचे बियाणेही खरेदी करून ठेवले आहेत, परंतु अद्याप जमिनीत ओल असल्यामुळे बियाणे सुकायला ठेवले असून शेतकरी पाऊस उघडण्याची वाट बघत आहे.
सातगाव पठार भागात 10 ते 12 वर्षांपूर्वी जास्त पोल्ट्री व्यवसाय जोरात सुरू होते. अनेक शेतकऱ्यांनी दुय्यम व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्म सुरू केले होते. पण बर्ड फ्लू व अनेक रोगांच्या साथीने तसेच बाजारभाव कमी मिळत असल्याने येथील अनेक शेतकऱ्यांनी आपले पोल्ट्री बंद केले आहेत. सध्या बॉयलर कोंबडीला मागणी असल्याने येथील दिलीप पवळे आणि त्यांचा मुलगा शिवाजी पवळे यांनी आपले पोल्टी सुरू ठेवले आहे. आता पिलांची संख्या निम्याने कमी असल्याने व पोल्ट्री अर्धी रिकामी असल्याने त्यात बटाट्याचे बियाणे सुकायला ठेवले आहेत.
सध्या परिसरात रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. जमिनीत ओलावा असल्याने शेतकरी वर्ग बटाटे लावण्याचे धाडस करीत नाहीत. शेतकऱ्यांनी बियाणे पावसाचा अंदाज पाहून खरेदी करून ठेवले आहेत. 3 हजार 200 ते 3 हजार 500 रुपये भावाने शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी केली आहे. जून महिन्यात शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. आता बियाणे सडून खराब होऊ नयेत, म्हणून शेतकरी पाऊस उघडण्याची वाट पाहत आहेत.
एकीकडे पोल्ट्री व्यवसायाला घरघर लागली आहे. बटाटा बियाणे हे पोल्ट्री फार्ममधील पक्षासोबत एका वेळीच ठेवले आहेत. जोडधंदा केल्याशिवाय शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही.
दिलीप पवळे, शेतकरी